पाथर्डी( जनता आवाज वृत्तसेवा):-राहुरी,नगर,पाथर्डी,नेवासा तालुक्यातील 45 गावांमधील 102 पाझर तलावामध्ये गुरुवार दिनांक 19 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडले जाणार आहे.नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आ. शिवाजीराव कर्डिले,आ. मोनिकाताई राजळे,आ. विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीमध्ये वांबोरी चारीला पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा झाली.
त्यानंतर मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याच्या संदर्भात सूचना देखील करण्यात आल्या आहेत.राहुरी मतदार संघातून आमदार कर्डिले मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर त्यांनी पहिला निर्णय शेतकरी हिताच्या दृष्टीने घेत वांबोरी चारीला सर्वप्रथम पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.सध्या मुळा धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे.त्यामुळे आमदार कर्डिले यांनी विरोधकांनी वांबोरी चारीला पाणी सोडण्याची मागणी करण्याअगोदरच शेतकरी हित लक्षात घेता शेतीच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देत तात्काळ वांबोरी चारीला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.
गुरुवारी दुपारी एक वाजता मुळा धरणातून वांबोरी चारीसाठी पाणी सोडले जाणार असून यावेळी आमदार कर्डिले यांच्यासह मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील,उपअभियंता कांबळे,शाखा अभियंता तसेच काही प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार आहेत.