बेलापूर – ( जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर मधील नियोजित २२० उच्चदाब क्षमतेच्या वीज उपकेंद्र उभारण्याच्या कामास लेटर ऑफ इंडेन (कार्यारंभ आदेश) मिळाले आहे. अंदाजे ४५ कोटी रुपये अपेक्षीत खर्चाच्या या कामाच्या पूर्णत्वास सुमारे दोन वर्ष लागणार आहे. संभाजीनगर येथील आयडिया इलेक्ट्रिकल्स अँड इंजीनियरिंग कंपनीस हे काम मिळाले आहे.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील जी १०३ आणि १०४ प्लॉटमध्ये हे उच्चदाब क्षमतेचे सबस्टेशन उभारण्यात येणार आहे. श्रीरामपूर तालुक्यातील शेकडो गावासाठी २२० उच्च दाब क्षमतेच्या रसब स्टेशन ची नीतांत आवश्यकता होती.
गेल्या ५० वर्षापासून तालुक्यात गावागावात शेतकऱ्यांसह उद्योजक आणि व्यापाऱ्यांना अत्यंत कमी दाबाने वीज उपलब्ध होत होती. सद्यस्थितीत श्रीरामपूर येथील सूतगिरणी येथे अल्प असे ३३ /११ केव्ही क्षमतेचे रोहित्र कार्यान्वित आहे. बाभळेश्वर आणि नेवासा येथून श्रीरामपूर शहर आणि तालुक्यासाठी सध्या अत्यंत कमी दाबाने याद्वारे वीज उपलब्ध होत आहे.
कमी दाबाने विज उपलब्ध होत असल्यामुळे शेतकरी व्यापारी आणि अनेक उद्योजकांना आजपर्यंत त्याचा मोठा त्रास सोसावा लागला.पढेगाव येथील उडान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इंजि. जितेंद्र तोरणे यांनी या उच्च दाब क्षमतेच्या सब स्टेशनसाठी फेब्रुवारी २०१९ पासून मोठा लढा उभारला.
मुंबई, नाशिक येथे सातत्याने पत्रव्यवहार करून हे सबस्टेशन मंजूर करून घेतले. त्यानंतर२०१९ ते २०२२ या कामाकडे कुणी लक्षही दिले नाही. २०२२ मध्ये तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना मोटार सायकल रॅली काढत बेलापूर येथील झेंडा चौकात फाउंडेशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
महापारेषण कंपनीने ऑगस्ट २०२४ मध्ये या उच्चदाब सबस्टेशन साठी जागा खरेदी केली. यानंतर हे काम पुन्हा एकदा मागे पडले. श्रीरामपूर तालुक्याचे संपूर्ण भवितव्य अवलंबून असणाऱ्या या उच्च दाब सब स्टेशनला गती मिळावी, यासाठी फाउंडेशन ने पुन्हा पुन्हा वेगवेगळी आंदोलने हाती घेतली.
नोव्हेंबर २०२४ मध्ये या उच्च दाब क्षमतेच्या सब स्टेशन कामासाठी निविदा निघाली. जानेवारी २०२५ मध्ये संभाजीनगर येथील आयडिया इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनिअर्स या कंपनीस कामासाठी एलआयओ (लेटर ऑफ इंडेन) नुकतेच देण्यात आले आहे.
येथील औद्योगिक विकास महामंडळातील सुमारे दीड एकर जागेत हे विस्तारित असे उच्चदाब क्षमतेचे सबस्टेशन उभारण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ होणार आहे.
उच्च दाब सबस्टेशन उभारणीसाठी उडान फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. शेतकरी व्यापारी आणि उद्योजकांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा या कामा कडे गेली ५० वर्ष कोणीच लक्ष दिले नाही. तालुक्याची गरज म्हणून आपण हा प्रश्न हाती घेतला. अनेक वर्ष संघर्ष करून हा प्रश्न सोडवला आहे. शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांना आता पूर्ण दाबाने वीज उपलब्ध होणार आहे. कमी दाबाने मिळत असलेल्या वीजेमुळे येथे उद्योजक येण्यास धजावत नव्हते.आता श्रीरामपूरच्या विकासाचे नवे पर्व यामुळे सुरू झाले आहे. त्याचा आपल्यास सर्वाधिक आनंद आहे.
इंजि – जितेंद्र तोरणे (इंजि)उडान फाउंडेशन, पढेगाव.