लोणी ( जनता आवाज वृत्तसेवा):-देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यात शेतक-यांचे योगदान मोठे असून,देशातील सर्वात मोठी गुंतवणूक ही कृषी क्षेत्रात होत आहे. कृषी क्षेत्रातील बदलते प्रवाह स्विकारून निर्यातक्षम शेतीसाठी संधी निर्माण करणे आणि सिंचन क्षमता वाढविण्यासाठी गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाचे प्रयत्न असल्याची माहीती जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्र व अध्यात्मिक विकास मार्ग आणि कृषी विभाग, संशोधन चॅरिटेबल स्ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात मंत्रीविखे पाटील यांनी शेतक-यांशी संवाद साधला. केंद्राचे प्रमुख गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे, माजी मंत्री आ.छगन भुजबळ, उध्दव महाराज निमसे, चंद्रकांत मोरे, पोलिस उपमहानिरीक्षक दत्तात्रय कराळे, डॉ.धनंजय धनवटे यांच्यासह मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, आधुनिक तंत्रत्रानाचा वापर करुन, शेतक-यांची उत्पादन क्षमता वाढविणे, यासाठी केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी तरतुद केली आहे. विविध योजनांमधून शेतकक-यांना मदत करणे हेच सरकारचे धोरण असून, जैविक खतांचा उपयोग करण्यासाठी सरकार सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी सांगितले.
रासायनिक खंताचा वारेमाप होणारा वापर थांबवून विषमुक्त शेती, यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे स्पष्ट करुन, निर्यातक्षम उत्पदन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. देशाच्या आर्थिक विकासात कृषी क्षेत्राचे योगदान मोठे आहे. जगात भारताची अर्थव्यवसथा निस-या क्रमांकावर आणण्यात कृषी क्षेत्राची मोठी मदत होणार असल्याचा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
गोदावरीच्या तुटीच्या खो-यात पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी आणून गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. परंतू अन्य पर्यायांचा उपयोग करुन, नदीजोड योजनेसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी विभागाचे प्रयत्न आहेत. ५६ टिएमसी पाणी गोदावरी तुटीच्या खो-यात आणून सिंचन वाढविण्यासाठी शासनाचा प्रयत्न असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.
राज्यात शेतीला जोडधंदा म्हणून दूग्ध व्यवसायाला पाठबळ दिले आहे. यासाठी देशी गायींचे वाण निर्माण करण्यावर भर देण्यात आला असून, गोशाळांना अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. गोमातेला राज्य मातेचा दर्जा आणि राज्य गोसेवा आयोगाची स्थापना करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील एकमेव राज्य असल्याचे त्यांनी सांगितले.
गुरुमाऊलींनी सलग १४ वर्ष कृषी प्रदर्शन भरविण्याची परंपरा कायम राखल्याचा उल्लेख करुन कृषिमंत्री असताना या प्रदर्शनाची सुरुवात करता आली. अध्यात्मिक परंपरेची योग्य सांगड कृषी क्षेत्रात घालून गुरुमाऊलींनी इथल्या मातीमध्ये आणि प्रत्येक माणसाच्या मनात रुजविलेला विचार खुप महत्वपूर्ण असल्याचा गौरवपुर्ण उल्लेख मंत्री विखे पाटील यांनी आपल्या भाषणात केला. मंत्री विखे पाटील यांनी गुरुमाऊली यांच्यासह माजी मंत्री आ.छगन भुजबळ आणि राष्ट्रपती पारीतोषिक मिळाल्याबद्दल विभागाचे पोलिस उपमहानिरिक्षक दत्तात्रय कराळे यांचा सत्कार केला.