संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- तालुक्यातील युवकांच्या रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीचा स्वतंत्र प्रकल्प शासनाने मंजूर करावा. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन कृषी प्रक्रिया उद्योग आणि शित गृहाचे उभारणी करावी आणि पुणे नाशिक रेल्वे मार्ग प्रस्तावित आराखड्याप्रमाणे संगमनेरातून व्हावा आशा मागण्या आ.अमोल खताळ यांनी विधानसभेत केल्या.
राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार दर्शक ठरावाच्या चर्चे दरम्यान आ.खताळ यांनी राज्याच्या विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून, त्यादृष्टीने होत असलेल्या निर्णयाचे आणि धोरणांचे त्यांनी स्वागत केले.
हाराष्ट्र राज्य हे देशाच्या आर्थिक विकासाचा स्तंभ असून,राज्याला औदयोगीक विकास, कृषी परंपरा मोठी आहे. त्याला गती देण्याचे काम शासनाच्या माध्यमातून होत असल्याचे समाधान आ.खताळ यांनी व्यक्त केले.
महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात स्वतंत्र औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी करून आ.खताळ म्हणाले की, औद्योगिक गुंतवणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य आकर्षक ठरत आहे.एकूण १५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्याच्या उद्योग क्षेत्रात होत असल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होतील आशी अपेक्षा व्यक्त करतानाच,संगमनेर तालुक्यात औद्योगिक वसाहत मंजूर झाल्यास तालुक्यातील युवकांना रोजगारांच्या संधी निर्माण होऊ शकतील.तालुक्यात कृषी परंपरा मोठी असून,पारंपारिक पिकांच्या उत्पादना बरोबरच कृषी प्रक्रिया उद्योग आणि शीत गृहाची उभारणी झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ होईल याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
राज्य सरकाराने मागेल त्याला सौरपंप योजना सुरु केली.यामुळे विजेच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. तालुक्यातील शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज दाखल केले आहेत.मात्र डार्क झोनची अट सांगून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक आणि भूजलचे दाखले देण्याची अट शिथिल करावी अशी मागणी आ.खताळ यांनी आपल्या भाषणात केली.
तालुक्यातील सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्था सुरळीत होणे गरजेचे आहे.यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा याकडे लक्ष वेधून, केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष प्रा.रंगनाथ पठारे हे संगमनेर मतदार संघातील असल्याचे त्यांच्या सन्मानासाठी राज्य सरकारने त्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम संगमनेर येथे होण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी सूचना आ.खताळ यांनी आपल्या भाषणात केली.



