अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा): – महाराष्ट्र विधानमंडळ संसदीय ऑनलाईन प्रणालित बदल करून जिल्ह्याचे व शहराचे नाव अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर करावे. या बदलासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, या मागणीचे निवेदन अहिल्यानगरचे आ.संग्राम जगताप, आ.विठ्ठल लंघे व आ.अमोल खताळ या महायुतीच्या आमदारांनी विधानमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंगळवारी विधानभवनात दिले.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात मंगळवारी आ.जगताप, आ.लंघे व आ.खताळ यांनी सभापती राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही महिन्यापूर्वी अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नामांतर ‘अहिल्यानगर’ करण्यात आले आहे. त्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिल्यानंतर केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्र शासनाने राजपत्रित अधिसूचना प्रसिद्ध करून अधिकृतरीत्या शहर व जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ असे निश्चित केले आहे.
मात्र, अद्याप महाराष्ट्र विधानमंडळाच्या संसदीय ऑनलाईन प्रणालीत शहराचे व जिल्ह्याचे नाव अहमदनगर असेच दर्शवले जात आहे. शासनाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, हे नामांतर झाले असल्याने आपल्या कामकाजात अहिल्यानगर असे अद्ययावत करणे आवश्यक आहे. तरी या बाबत तातडीने संबधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत.