शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा):-जेष्ठ चित्रपट अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनानं भारतीय चित्रपट सृष्टीत अमूल्य योगदान देणारा कलाकार आपण गमावला असून, साईबाबांवरील चित्रपटाच्या माध्यमातून मनोज कुमार यांनी शिर्डीच्या भूमीशी जोडलेल नात अतूट राहीले आशा शब्दात जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
आपल्या शोक संदेशात मंत्री विखे पाटील यांनी म्हणले आहे की, अभिनेते मनोज कुमार यांनी चित्रपट सृष्टीत आपले वेगळेपण नेहमीच दाखवून दिले. शहीद चित्रपटाच्या माध्यमातून मनोज कुमार यांची देशाला ओळख झाली. रोटी कपडा और मकान या चित्रपटातून सामाजिक आशय त्यांनी पुढे आणला.
मनोज कुमार यांनी फक्त एक कलाकार म्हणून नाही तर लेखक, दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केले. भारतीय चित्रपट सृष्टीला एका उंचीवर नेवून ठेवण्यात मनोज कुमार यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही.
दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित झालेले मनोज कुमार यांचे साईबाबांच्या शिर्डी नगरीवर विशेष प्रेम होते. साईबाबांच्या चित्रपटाची निर्मिती करून त्यांनी या अध्यात्मिक नगरीची ओळख सर्वदूर पोहचवली. साईबाबांवर त्यांनी तयार केलेल्या गाण्याची आठवण भक्तांच्या सदैव स्मरणात राहील. शिर्डी शहरातील मार्गाला मनोज कुमार यांचे नाव देवून शिर्डीकरांनी या महान कालाकाराप्रती एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली आहे.



