श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- आज दिनांक 15 4 2025 रोजी सकाळी श्रीरामपूर येथे कांदा मार्केट सुरू झाले एक महिन्यापूर्वी अडीच ते तीन हजार रुपये विकणारा कांदा एक हजार रुपयांच्या आत लिलाव झाल्याने आधीच कर्जबाजारी असलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले.
यावेळी दूरध्वनी वरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्याशी संपर्क साधून बाजार समितीचे सचिव साहेबराव वाबळे यांच्याशी फोनवर बोलणे करून दिले. श्री औताडे यांनी श्री वाबळे यांना जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळत नाही व कांद्याला दोन हजार रुपये च्या पुढे भाव मिळत नाही तोपर्यंत बेमुदत कांदा मार्केट बंद ठेवा अशा सूचना केल्या.
19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील व अजित काळे यांनी कर्जमुक्ती आंदोलनाची जनजागृती केली. गेले एक महिनाभर जनजागृती करून 19 मार्च 2025 रोजी सेंट्रल बिल्डिंग पुणे महसूल आयुक्त येथे हजारो शेतकऱ्यांचा असंतोष मोर्चाच्या स्वरूपात शासनाला जाग आणण्यासाठी दिसून आला.
वास्तविक या आंदोलनाची दखल राज्य शासनाने घेणे अपेक्षित होती परंतु अर्थमंत्री अजित पवार यांनी 31 मार्च च्या आत शेती कर्ज भरा असे आदेश केले. एकीकडे उत्पादन खर्च इतकाही भाव शेतकऱ्यांना द्यायचा नाही आणि दुसरीकडे शेतकऱ्यांकडून कर्ज भरून घेण्याची अपेक्षा करायची अशा शासनाचा काल शेतकरी संघटना व स्वातंत्र भारत पक्षाने होळी करून निषेध केला तसेच प्राथमिक स्वरूपात इशारा म्हणून तीन तास कांद्याने भरलेल्या ट्रक बाजार समिती श्रीरामपूरच्या गेटवर अडविल्या गेल्या. आज त्याच कांद्याला एक हजार रुपये भावाने खरेदी करून बाजार समिती श्रीरामपूर येथे मंत्री विखे पाटील भाजपा, अशोकचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे(अपक्ष), जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे काँग्रेस यांच्या सर्वपक्षीय अधिपत्याखाली असून मंत्र्यांचे अस्तित्व असलेल्या बाजार समितीमध्ये कांदा 600 ते 800 रुपये प्रति क्विंटल विकताना शेतकऱ्यांचा असंतोष निर्माण झालेने शेतकऱ्यांनी बाजार समितीत कांदा आणण्याचे बंद करून बाजार समिती बंद ठेवा अशा घोषणा दिल्या.वास्तविक बाजार समितीवर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून संचालक मंडळ अस्तित्वात आहे.
परंतु अशा संचालक मंडळाकडून शेतकऱ्यांसाठी शासन स्तरावर कुठेही आवाज उठवताना दिसत नाही ,इथेच शेतकऱ्यांचा घात झालेला आहे. तरी राज्यातील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असलेल्या बाजार समितीमध्ये शेतकरी कर्जमुक्ती साठी व कांद्याला दोन हजार रुपये भाव मिळण्यासाठी बेमुदत बाजार समित्या बंद ठेवाव्या असे आव्हान आयल्या नगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केले. श्रीरामपूर बाजार समितीमध्ये सायंकाळी पाच वाजता शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने बाजार समिती व्यवस्थापनाशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष अनिलऔताडे, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे, साहेबराव चोरमल, डॉक्टर बाबासाहेब, एडवोकेट सर्जेराव घोडे, एडवोकेट प्रशांत कापसे, कांदा व्यापारी शरद कोठारी, संतोष पटारे, सुजित बोडके, अकबर शेख , भास्कर तुवर,अरुण खुरुद, बाजार समितीचे हमाल भाऊसाहेब आंग्रे, संजय थोरात आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.