श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):-श्रीरामपूर शहराच्या विकासाची दिशा निश्चित झाली आहे. मात्र कोणालाही विस्थापित करून विकासाची प्रक्रीया राबविता येणार नाही. प्रवरा कालवे अतिक्रमण मुक्त करण्याची कार्यवाही अधिक कठोरपणे राबवून कालवे प्रवाही करण्याच्या दृष्टीने विभागाचे प्रयत्न सुरूच राहाणार असल्याची माहीती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
शहरातील प्रवरा डाव्या कालव्यावरील वितरीका क्र.१२ आणि १३ तसेच नाॅर्दन ब्रॅन्च वितरीका क्र.१ यांचे पुर्नस्थापना व नूतनीकरण कामांचा शुभारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत तसेच भाजपाचे जेष्ठ नेते हेरंब औटी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमास जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता गोवर्धने, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे, नितीन दिनकर, दिपक पठारे, गिरीधर आसने, शरद नवले, नानासाहेब पवार, संजय फंड यांच्यासह नागरीक उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की शहरात विकासाची प्रक्रीया साध्य करायची असेल काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. यामुळे काहीजण दुखावतील पण यामुळे शहराला विकासाचा चेहरा मिळणार नाही. शिर्डी राहाता येथे अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवली त्यामुळेच विकास होवू शकला.
कोणाला विस्थापित करण्याचा प्रयत्न होणार नाही असे स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, विभागाच्या काही जागावर झालेले अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. शहरात म्हाडाच्या विकसित होत असलेल्या वसाहतीत काहीजणाचे पुर्नवसन करता येईल का याचा विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कालवे प्रवाही करण्यासाठी अतिक्रमण काढण्याशिवाय पर्याय नाही. जलसंपदा विभागाने सर्वत्र यासाठी मोहीम हाती घेतली असून लाख बंधार्याचे काम सुध्दा तातडीने काम सुरू करण्याची ग्वाही विखे पाटील यांनी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हेरंब औटी यांनी आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील यांच्या कार्यपध्दतीचे कौतुक करून कालव्याच्या कामाचा शेतकर्यांना निश्चित लाभ होईल.राज्याच्या पाणी प्रश्नाबाबत मंत्री विखे पाटील यांचा असलेला अभ्यास आणि अनुभव याचा नक्कीच प्रश्न सोडविण्यसाठी उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांनी केले.
मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत नगरपालिकेच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार्या २कोटी रुपयांच्या अग्निशमन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.या कार्यक्रमास शहरातील आजी माजी नगरसेवक आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
गोळवलकर गुरूजी व पद्मश्री यांच्या भेटीची आठवण!
जेष्ठ नेते हेरंब औटी यांनी आपल्या भाषणात जुनी आठवण सांगताना श्रीरामपूरात गोळवलकर गुरूजी पहील्यांदा आले तेव्हा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील दोन हजार शेतकऱ्यांना घेवून त्यांच्या भेटीसाठी आले होते. आज त्यांचे पणतू काम करत आहेत. त्यांच्या समवेत कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याची संधी मिळाली.



