लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ४५ व्या पुण्यतिथी निमित्ताने तसेच लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या ९३ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून लोणी बुद्रूक ग्रामस्थांच्यावतीने संत तुकाराम महाराज गाथा पारायण व किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाची सुरुवात रविवार दिनांक २७ एप्रिल पासून होत असून, या महोत्सवाचा सांगता समारंभ दिनांक ५ मे २०२५ रोजी होणार आहे.
दरवर्षी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांची पुण्यतिथी आणि पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती दिना निमित्त अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गेली अनेक वर्ष संत तुकाराम गाथा पारायण सोहळा आणि किर्तन महोत्सवातून अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ एकत्रित येवून करीत असतात. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकूठंगमन सोहळा असल्याने यंदाच्या किर्तन महोत्सवाचा अध्यात्मिक आनंद सर्वांना मिळावा म्हणून ग्रामस्थांच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे.
या सोहळ्याचाच एक भाग म्हणून ४ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता गाथा पारायण सोहळ्याची सांगता आणि दिपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, ५ मे रोजी या किर्तन महोत्सवाची सांगता महंत उध्दव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे. या किर्तन महोत्सवाची जय्यत तयारी लोणी बुद्रूक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली असून, श्रीराम मंदिर पटांगणात भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे.



