राहाता( जनता आवाज वृत्तसेवा) :-राहाता तालुक्यातील गोगलगाव येथे बुधवारी दुपारच्या सुमारास साहिल दत्तात्रय चौधरी ( वय १९ ) व त्याचा भाऊ किरण नारायण चौधरी ( वय १६ ) हे येथील बंधाऱ्याच्या ओढ्याच्या कडेला पाणी वाहत असलेल्या किटवेअर येथे हातपाय धुत असताना अचानक किरनचा पाय सरकल्याने तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी साहिलने हात दिला असता साहिल पण पाण्यात पडला. यातच दोघांचा मृत्यू झाला .
ही घटना बुधवारी दुपारी घडली, दोघे सख्खे चुलत भाऊ आपल्या शेतात आळीपाळीने खत पांगवण्यासाठी गेले होते काम झाल्यानंतर ते घरी परतत असताना येथील बंधाऱ्यात निळवंडे आवर्तन चालू आहे, येथे निळवंडेच्या डाव्या कालव्यातून पाणी साठवले जात होते परंतु सदर ओढ्यात दोघे भाऊ हातपाय धुण्यासाठी थांबले असता हा गंभीर प्रकार घडला . गोगलगाव गावकऱ्यांना ही माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचा शोध सुरू केला.जवजवळ अर्ध्या तासानंतर दोघांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना लगेचच प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्या दोघांनाही मृत घोषित केले.
या घटनेमुळे गोगलगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.सर्व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेनुसार लोणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.