अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पिक कर्जदार शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री राष्ट्रीय सुरक्षा विमा अंतर्गत रुपये दोन लाखाचा अपघाती विमा जिल्हा बँक आपल्या स्वनिधीतून उतरविणार असल्याचा निर्णय संचालक मंडळ सभेमध्ये झाला असल्याची माहीती बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.
बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कर्जवितरण करण्यात येत असून जिल्ह्याच्या एकूण कर्जवितरणात जिल्हा बँकेचा सिंहाचा वाटा आहे. जिल्हा बँकेचे रुपे किसान क्रेडिट कार्डधारक शेतकऱ्यांची संख्या चार लाखांच्यावर असून या शेतकरी सभासदांचे अपघाती विमा उतरविणेकरीता बँकेला रक्कम रुपये ८० लाखांच्यावर खर्च येणार असल्याची माहिती चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी देवून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी सोसायटी माध्यमातून पिक कर्ज घेवून बँकेचे रुपे फिरान क्रेडिट कार्ड घ्यावेत.
ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही रुपे किसान क्रेडिट कार्ड घेतलेले नसतील, त्यांनी त्वरीत आपल्या बँकेच्या शाखेकडे रुपे किसान क्रेडिट कार्डची मागणी करण्याचे आवाहन चेअरमन कर्डिले व व्हा. चेअरमन अॅड. माधवराव कानवडे यांनी केले.
या विम्याबाबत अधिका माहीती देताना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी सांगितले की, बँकेकडून अपघाती विमा उतरविण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांचा दुर्देवाने अपघाती मृत्यु झाल्यास रुपये दोन लाखाची भरपाई मिळेल. तसेच अपघातात एक अवयव निकामी झाल्यास ५० टक्के, दोन अवयव निकामी झाल्यास १०० टक्के नुकसान भरपाई मिळणार आहे.
परंतू नैसर्गिक मृत्यु झाल्यास कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही. ही योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय सुरक्षा विमा योजने अंतर्गत असून त्यांचे नियम व अटी यांना लागू राहणार असल्याची माहीती वर्पे यांनी दिली.