अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):- मागील मे महिन्यामध्ये शहरालगत ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला होता यामध्ये सारसनगर मधील कु. तन्वी केदार रासने या 18 वर्षीय युवतीचा स्लॅब कोसळून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता तसेच परिसरातील नागरिकही तन्वीच्या जाण्याने शोक व्यक्त करत होते नुकतीच तिने बारावी परीक्षा दिली होती तिला 86% गुणही मिळाले होते अभ्यासात हुशार असणारी विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख होती, रासने कुटुंब हे सदन असून त्यांनी मुलीच्या नावे ट्रस्ट स्थापन केले आहे त्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाणार आहे, रासने कुटुंबीयांनी सामाजिक उपक्रमाचा घेतलेला निर्णय समाजाला दिशादर्शक आहे अशी भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
स्व. तन्वी केदार रासने कुटुंब यांना शासनाच्या माध्यमातून ४ लाख रुपये आर्थिक मदतीचा धनादेश आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, वडील केदार रासने, आई वैशाली रासने आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आमच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत झाली आहे, मात्र ही मदत मुलगी स्व. तन्वी रासने हिच्या नावे फाउंडेशन स्थापन करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाणार आहे, जोरदार पावसामुळे स्लॅब कोसळून मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे व परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत मिळून दिली व आधार देण्याचे काम केले असल्याची भावना वडील केदार रासने यांनी व्यक्त केली.
सारसनगरमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये तन्वी रासने या 18 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला या कुटुंबांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळून देण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी शासनाकडे पाठपुरावा केला आणि त्यानंतर शासनाने तातडीने मदत व पुनर्वसन विभाग या माध्यमातून ४ लाख रुपयांची आर्थिक मदत बँक खात्यावर जमा केली असल्याची माहिती प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी दिली