अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा) : – शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उचललेले पाऊल कामाच्या माध्यमातून पूर्णत्वाकडे जात आहे सीना नदी सुशोभीकरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त करून दिला आहे त्यानुसार पुणे महामार्ग लगत असलेल्या सीना नदी पात्र सुशोभीकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे जात आहे, तसेच दुसऱ्या टप्प्यातील अमरधाम कल्याण रोड परिसरातील व तिसऱ्या टप्प्यातील सावेडी गावालगतच्या सीना नदी सुशोभीकरणाचे काम करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या सीना नदी सुशोभीकरण कामाची पाहणी करण्यात आली, यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, शहर उपअभियंता श्रीकांत निंबाळकर, संतोष लांडे, भूपेंद्र परदेशी आदी उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप पुढे म्हणाले की, शहरातून सिना नदीचा 13 किलोमीटरचा प्रवाह जात असून सन 2009 मध्ये महापौर असताना राज्य शासनाच्या माध्यमातून सिना नदी सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता काम देखील सुरू झाले होते परंतु काही राजकीय लोकांकडून विरोध झाला आणि ते काम बंद पडले, त्यानंतर अहिल्यानगर शहरातील जनतेने विधानसभेची जबाबदारी माझ्यावर टाकली, काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे मतरुपी जबाबदारी दिली आणि 2016 मध्ये नदीपात्राच्या प्रश्नासंदर्भात विधानसभेत आवाज उठविला, तेव्हापासून पाठपुरावा सुरू केला आणि त्यानंतर सीना नदीचे पात्र मोजण्याचे व हद्द निश्चितीचे काम पूर्ण झाल्यानंतर सिनानदी सुशोभीकरण कामाला वेग आला, सीना नदी पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे जात आहे पुणे रोड लगतच्या सीना नदी सुशोभीकरणाचे काम सुरू असून या ठिकाणी नागरिकांना पायी चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे या परिसरातील नागरिकांना मनोरंजनासाठी येता येणार आहे पुढील काही वर्षांमध्ये सीना नदीचे रूप पालटल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही नागरिकही आता सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करत आहे असे ते म्हणाले.
शहरातील मैलमिश्रित पाण्याचा प्रश्न गंभीर होता तो सोडवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून अमृत भुयारी गटात योजना मंजूर करून आणली आणि जुन्या गावठाण भागातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण देखील झाले आहे, सीना नदी पात्रात सोडण्यात आलेले मैलामिश्रित पाणी आता सीना नदीलगत टाकण्यात आलेल्या मोठ्या पाईपद्वारे वाहून जाऊन त्याचे जलशुद्धीकरण होणार आहे, त्यामुळे आपली सीना नदी आता प्रदूषण मुक्त होईल, या सर्व कामाचे श्रेय आमदार संग्राम जगताप यांना जाते असे मत माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केले
सीना नदी कामाबरोबर नदीपात्रालगत 24 तास ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करून ऑक्सिजन पार्क निर्माण केला जाईल आमदार संग्राम जगताप यांच्यामुळे सीना नदी पात्राचे रूप पालटणार आहे शहरामध्ये वृक्षरोपण व संवर्धनाची लोक चळवळ उभी करायची आहे तरी नगरकरांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रत्येकाने एक तरी झाडाचे जतन करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले.