राहाता(जनता आवाज वृत्तसेवा):-जिल्ह्यात मागील काही दिवसांत मोठ्या स्वरुपातील पावसाने झालेल्या नूकसानीचा विचार करता स्थायी आदेशाच्या पलिकडे जावून मदत करण्याचा विचार करावा लागणार आहे.यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली असल्याची माहीती जलसंपदा तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर, राजुरी ममदापूर, तिसगाव वाडी,अस्तगावच्या काही भागांमध्ये चक्रीवादळ सदृश्य पावसाने या भागातील डाळिंब,आंबा, ऊस आणि साठवलेल्या कांद्याचे तसेच घरे गोठा यांवर झाडे पडून मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाला जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेटी देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देत सरकार हे नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांसह नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही दिली.
झालेल्या नूकसानीचे सरसकट सरसकट पंचनामे करा, महावितरणाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करावे अशा सूचना मंत्री विखे पाटील यांनी पाहाणीनंतर अधिकाऱ्यां समवेत घेतलेल्या बैठकीत दिल्या.
शनिवारी सायंकाळी बाभळेश्वर, राजुरी, ममदापूर, तिसगाव, अस्तगाव या भागामध्ये चक्री वादळाने या भागातील फळबागा तसेच शेती पीकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. भाऊसाहेब विनायक म्हस्के यांची कांदा चाळ, डाळिंब उत्पादक राहुल सुरेश कसाब आणि डाळींबरत्न बी. टी. गोरे यांच्या डाळींब बागा थेट शेतात जाऊन या नुकसानग्रस्त भागाची पाहणी त्यांनी केली यावेळी प्रांत अधिकारी माणिक आहेर तहसीलदार अमोल मोरे तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांच्यासह वीज वितरण कंपनी सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधत सरकार आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.शासनाच्या वतीने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.ज्या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी अडचणी आहेत मदत देण्यासाठी अडचणी आहेत या संदर्भात आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याशी बोलून नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
वातावरणात झालेल्या बदलाने नैसर्गिक चक्र पूर्णपणे बदलले आहे.काही दिवसांपुर्वी पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसाने एका दिवसात धरणात एक टिएमसी पाणी येणे हे सुध्दा घडू शकते.त्यामुळे नैसर्गिक परीस्थितीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही.
वादळी वाऱ्याने या भागातील वीज पुरवठा हा गेल्या दोन दिवसापासून बंद आहे वीज पुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी युध्द पातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले. आपत्ती नैसर्गिक आपती असली तरी,भविष्यात नुससान कसे टाळता येऊ शकते यावरच उपाय योजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येकाचा पंचनाम करून तातडीने अहवाल सादर करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
पाहणी दरम्यान त्यांनी डाळिंब उत्पादकांशीही संवाद साधला अनेक भागांमध्ये डाळिंब उत्पादकांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरले आहे आणि नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांना उत्पादनही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. राहुल कसाब यांची फळभाग पूर्णपणे भुईसपाट झाली आहे, या बागेची पुन्हा बांधणी करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याविषयी डाळिंबरत्न डाॅ. बी.टी. गोरे यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आंबा, कांदा उत्पादकांना देखील या वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. चाळीत असलेला कांदा आणि त्यावर पडलेल्या झाडांमुळे कांदा पूर्णपणे भिजलेल्या कांद्याचे पंचनामे अधिकाऱ्यांनी करून अहवाल त्वरित पाठवण्याची सूचना त्यांनी केल्या आहेत.