अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा) :- केडगाव उपनगराचे अंबिकानगर हे सर्वात जुनी वसाहत असून या ठिकाणी नागरिकांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नांची आ. संग्राम जगताप यांनी पाहणी करत. अंबिकानगरच्या उत्तरेस जो नैसर्गिक ओढा आहे, त्यावर अतिक्रमण झाले असून, अतिवृष्टी झाल्यास, सर्व परिसरामध्ये दुर्गंधयुक्त पाणी घरामध्ये शिरते, ही समस्या गेल्या अनेक वर्षापासून असून तीव्रतेने वाढत आहे. ओढ्यावर ज्यांनी अतिक्रमण केले आहे, ते अतिक्रमण काढून, ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह आहे तसेच ठेवावा. अंबिकानगर मधील सर्व प्रमुख रस्ते, ड्रेनेज लाईन सहित सिमेंट काँक्रिटीकरण करून मिळावेत, तसेच या परिसरामध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले असून लाईटची व्यवस्था करून मिळावी. तसेच या परिसरामध्ये ८-८ तास लाईट नसते तरी, स्वतंत्र लाईटची डीपी बसवण्यात यावी. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या घंटागाडी रोज येणे अपेक्षित आहे तसेच ADCC केडगाव बँकेच्या मागच्या बाजूस जे नवीन अपार्टमेंट झाले त्यासमोर रस्त्यावरच कचरा टाकला जातो ते ताबडतोब थांबविणे आवश्यक आहे.
अंबिकानगरमध्ये, नगर पुणे रस्त्यावरून जो प्रवेश केला जातो, ते प्रवेशद्वारच भाजीपाला विक्रेत्यांनी अडवलेले आहे. सदर भाजीपाला बाजार या ठिकाणाहून बंद करून त्यांना पर्यायी व्यवस्था आपण कायमस्वरूपी द्यावी. रस्त्याच्या दोन्ही बाजूस भाजीपाला विक्री करणारे बसल्यामुळे शाळेचे लहान मुलं, वृद्ध व नागरिकांना रस्त्यावरून जातांना कायम छोटे-मोठे किरकोळ अपघात होत असतात. आपल्या निधीमधुन जो रस्ता आपण नवीन विकसित केला आहे, तो काय भाजीपाला विक्री करण्यासाठी केलेला नसून, त्यावरील अतिक्रमण ताबडतोब कायमस्वरूपी हटवावे. छत्रपती शिवाजी मंगल कार्यालयाचे नाव: श्री. छत्रपती शिवाजी सांस्कृतिक भवन असे करावे अशी मागणी अंबिकानगर मधील नागरिकांनी आ. संग्राम जगताप यांच्या निवेदनाद्वारे केली.
यावेळी मा. नगरसेवक अमोल येवले, सुनीलमामा कोतकर, सुनील कोतकर, जालिंदर कोतकर, अजित कोतकर, महेश गुंड, सुमित लोंढे, बाबासाहेव राशिनकर, संजय बोरगे, शरद आचारी, शिरीष होडे, नंदकुमार पौळ, अजित पवार, दिलीप शेजुळ, प्रमोद शेजुळ, ज्ञानेश देशपांडे, डॉ. श्रीकृष्ण जोशी, राजु लोडगे, प्रवीण रोडे, वसुंधा देशपांडे, निशा बोरगे, सविता लाळगे प्रियांका शहाणे आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केडगाव उपनगराच्या विकासाची जबाबदारी आम्ही स्वीकारले आहे, ती पूर्णत्वाकडे नेण्याचे काम केले जात आहे. केडगावकरांनी विधानसभेला माझ्यावर जो विश्वास टाकून मतदान केले, त्या बद्दल केडगावकरांचे आभार मानतो. नियोजनबद्ध विकासाची कामे मार्गी लागत असल्यामुळे चेहरा मोहरा बदलत आहे. केडगाव मधील डीपी व कॉलनी अंतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लावली आहे. नागरिकांचे मूलभूत प्रश्नांपासून काम केले असल्यामुळे ते समाधान व्यक्त करत आहे. लिंक रोड कामाच्या माध्यमातून केडगावच्या विकास कामात भर पडली असल्याचे मत आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
केडगावमधील अंबिका नगर ही जुनी वसाहत असून या परिसरातील विविध प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली आहे, त्यामुळे हे प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील. केडगाव उपनगराची विकासाची कामे मार्गी लागत असल्याने केडगावकर समाधान व्यक्त करत आहे. अशी भावना मा. नगरसेवक अमोल येवले यांनी व्यक्त केली.