संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):–खरीप हंगाम सुरू झाल्याने तालुक्यातील व राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी युरियाची गरज आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून बफर स्टॉक मधून 50% युरिया रिलीज करून शेतकऱ्यांना तातडीने युरिया उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महाराष्ट्राची माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सरकारकडे केली आहे.
महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबतचे पत्र महाराष्ट्र सरकारला दिले आहे. हे पत्र तालुका कृषी अधिकारी रजा बोडके यांनी स्वीकारले असून हे निवेदन सतीश खताळ व नामदेव शिंदे यांनी दिले आहे.
या पत्रात म्हटले आहे की , सध्या राज्यात सर्वत्र खरीप हंगाम सुरू आहे. पेरणी साठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली आहे. अशा काळामध्ये शेतकऱ्यांना युरियाची मोठी आवश्यकता आहे. मात्र सर्वत्र युरियाच्या टंचाईला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. संगमनेर तालुक्यातही सर्वत्र पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात युरिया गरज आहे .तालुक्यात शासनाने युरियाचा साठा करून ठेवला असल्याने शेतकऱ्यांना युरिया मिळण्यात मोठी अडचण होत आहे त्यामुळे शासनाकडे असलेल्या बफर स्टॉक मधून तातडीने 50% युरिया रिलीज करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मा. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
ही निवेदन दिल्यानंतर कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी तातडीने कार्यवाही करून 50% युरिया रिलीज करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मा. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी
अवकाळी पाऊस किंवा कोणतेही संकट आले की महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा मा. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात हे कायम शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहिले आहे. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सातत्याने सरकार दरबारी मांडले असून न्याय मिळवून दिला आहेशेतकऱ्यांचे नेते म्हणून राज्यभर त्यांची ओळख असून युरियाची टंचाई जाणवत असताना माजी मंत्री थोरात यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांना युरिया मिळणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.