शिर्डी(जनता आवाज वृत्तसेवा): – श्रीरामपूर तालुक्याला भेडसावणाऱ्या अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण २२०/३३ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीज उपकेंद्रामुळे होणार असून शेती व एमआयडीसीमधील उद्योगांना पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होऊन तालुक्यात नवीन उद्योग वाढीला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये ५९ कोटी ६२ लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या २२०/३३ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीज उपकेंद्राचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार हेमंत ओगले, महापारेषणचे मुख्य अभियंता संजीव भोळे, अधीक्षक अभियंता संजय अत्राम, श्रीकृष्ण नवलाखे, अशोक मडावी, हादी खान तसेच जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, दीपक पठारे, नानासाहेब शिंदे, सचिन गुजर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले , महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनीच्या या प्रकल्पामुळे श्रीरामपूर औद्योगिक वसाहत, एमआयडीसी परिसर, बेलापूर, भोकर, नायगाव, हरेगाव, सुतगिरणी, शिरसगाव, उक्कलगाव, मातापूर आणि सन फ्रेश या कंपनीसह आसपासच्या भागातील वीजदाबाची समस्या कायमची दूर होईल. आजवर या भागात कमी दाबामुळे अनेक उद्योग अडचणीत होते. सुमारे ६० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाची कामे महावितरणकडून एक वर्षात पूर्ण करण्यात येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याने हे वीज उपकेंद्र साकार होणार आहे. राज्य विजेच्या बाबतीत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. ६५ हजार मेगावॅट क्षमतेचे पंप स्टोरेज हायड्रो प्रकल्प आणि ३.२५ लाख कोटींच्या गुंतवणुकीतून हे काम सुरू आहे. जुन्या प्रकल्पांचेही नूतनीकरण होत असून, सौर ऊर्जेच्या माध्यमातून राज्यातील ४० टक्के कृषी फिडर सौरऊर्जेवर आणण्याचा संकल्प आहे. त्यामुळे वीज दरात १० ते २६ टक्क्यांची घसरण होईल. नेट मीटरिंगमुळे घरगुती ग्राहकांनाही लाभ होत आहे. ७.५ हॉर्सपॉवरपर्यंत मोफत वीज देण्याचे धोरण कायम असून, राज्य विजेसंदर्भात स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी १ लाख कोटींच्या जलसंधारण योजनांवर काम सुरू आहे. गोदावरी-जायकवाडी प्रकल्प, पाण्याचे पुनर्वहन, भंडारदऱ्यातील अतिरिक्त पाणी आणि खोऱ्यांमधील योजना राबवल्या जात आहेत. भाषणांवर आणि मोर्चांवर न थांबता प्रत्यक्ष कामांवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले केले.
आमदार हेमंत ओगले म्हणाले, सध्या श्रीरामपूर तालुक्याला बाभळेश्वर व नेवासा तालुक्यातून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे अनेक ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होत असून, शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नव्या उपकेंद्रामुळे या समस्या दूर होतील व एमआयडीसीमध्ये नवे उद्योगधंदे सुरू होऊन रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. प्रास्ताविक मुख्य अभियंता संजीव भोळे यांनी केले.