लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-नागरीकांच्या समस्यांचा निपटारा तसेच सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नव्या पॅटर्नची जोरदार चर्चा सध्या प्रशासानात सुरु आहे. नागरिकांच्या समस्यांबाबत तसेच शासनाच्या विरोधात दिशाभूल करणा-या वृत्तपत्रात येणा-या बातम्यांची गांभीर्याने दखल घेत यावर संबंधित विभागाच्या अधिका-यांना तातडीने खुलासा करुन प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करण्याची नवी यंत्रणा त्यांनी कार्यान्वित केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही विभागाच्या विरोधात वृत्तपत्र, वृत्तवाहीन्या आणि समाज माध्यमांमध्ये दिशाभूल करणा-या येणा-या बातम्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे त्या विभागाच्या सचिवांनी लगेच खुलासा करुन सरकारची बाजू मांडण्याबाबतचा शासन आदेश यापुर्वीच काढला आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडूनही शासनाच्या योजना, नागरीकांच्या प्रश्नाबाबत तसेच सार्वजनिक विकास कामांच्या संदर्भात विरोधी येणा-या वृत्ताची दखल व्यक्तिगत स्तरावर मंत्री विखे पाटील यांनी घेण्यास सुरुवात केली आहे.
एखाद्या विभागाचे नागरीकांच्या समस्यांकडे होणारे दुर्लक्ष, सार्वजनिक प्रश्नांची समस्या तसेच लोकांसाठी असलेल्या योजनांबाबत शासनाकडून होणारी अडवणूक याबाबत दैनंदिन वृत्तपत्रात बातम्या प्रसिध्द होत असतात. या बातम्यांची दखल घेवून, संबधित विभागाला त्याबाबत स्वत: पालकंमंत्री बातमीच्या कात्रणासह पत्र पाठवून त्याचा खुलासा मागवून किंवा समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश देत आहेत. मागील तीन महीन्यापासून सुरू केलेल्या या नव्या पॅटर्नमुळे संबंधित विभागांना त्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचा खुलासा किंवा वृत्तपत्रात आलेल्या बातमी बाबत म्हणणे मांडण्याची संधी मिळाली आहे.
बातमी समवेत पाठविण्यात आलेल्या पत्राचा पाठपुरावा मंत्री विखे पाटील यांच्या कार्यालयातून करण्यात येतो. ज्या विभागांच्या तालुकास्तरीय कार्यालयांना पाठवण्यात येणा-या पत्राची प्रत त्यांच्या जिल्हास्तरीय, विभागीय कार्यालयांना तसेच जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येत असल्याने तीन स्तरावरून या पत्रांवर आता पाठपुरावा सुरु झाला आहे.
पालकमत्री कार्यालयातही याबाबतचे खुलासे तसेच नागरीकांचे प्रश्न निकाली लागत असल्याचे अहवाल केलेल्या कार्यवाहीसह प्राप्त होवू लागल्याने, पालकमंत्री विखे पाटील यांच्या नव्या पॅर्टनची चर्चा प्रशासनामध्ये आता सुरु झाली आहे. नागरीकांनाही त्यांच्य प्रश्नांचा पाठपुरावा झाल्याचे समाधान आणि अनुभव या निमित्ताने येवू लागला आहे.