अकोले(जनता आवाज वृत्तसेवा):-केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी जलजीवन योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन ठेकेदार आणि प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे अकोले तालुक्यातील एकही योजना पूर्ण होऊ शकली नाही असा आरोप करत यास जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली.
राजूर येथे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात आदिवासी भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अगस्ती साखर कारखान्याच्या व्हा. चेअरमन सुनीता भांगरे, शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद धुमाळ, महेश नवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश गडाख, संतोष मुर्तडक, विविध गावांचे सरपंच आदि उपस्थित होते.
यावेळी अकोले तालुक्यातील विविध भागातील नागरिकांनी जलजीवन मिशनच्या कामांच्या तक्रारीचा पाढा खासदार वाकचौरे यांच्या पुढे मांडला. या संदर्भात त्यांनी संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्या वर कारवाईची मागणी केली.
या आढावा बैठकीत सरपंच आणि नागरिकांनी आपल्या भागातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण आदी बाबतच्या समस्या खासदार वाकचौरे यांच्या पुढे मांडल्या. या बाबत उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावले.
यावेळी खासदार वाकचौरे यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ महिला आणि तरुणांनी घ्यावा असे आवाहनही केले. गाव तेथे रस्ता, स्मशानभूमी, पाणंद रस्ते शिवार व नकाशातील तसेच नकाशा बाहेरील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गटविकास अधिकारी अमर माने, वनक्षेत्रपाल डी डी पडवळे, रुपेश गावित, अशोक धिंदळे , सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता टी डी दहिफळे, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस एस घुगे, महावितरणचे उपअभियंता व्ही.बी. सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी श्याम शेटे, स.पो.नी. दिपक सरोदे, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
आदिवासी भागातील महत्वाच्या प्रश्नावर आढावा बैठक खासदार वाकचौरे यांनी बोलावली असताना तालुक्याचे प्रमुख म्हणून तहसीलदार डॉ सिद्धार्थ मोरे अथवा महसूल चे कोणी ही उपस्थित नसल्या बद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.