शिर्डी(जनता आवाज वृत्तसेवा):- ग्रो मोअर कंपनीच्या माध्यमातून अहील्यानगर जिल्ह्यासह अन्यही काही भागातील गुंतवणूकदारांच्या झालेल्या फसवणुकीची व्याप्ती खूप मोठी असून याचा सखोल तपास होण्याची आवश्यकता आहे.मात्र गुंतवणूक केलेल्या नागरीकांनी तक्रार देण्यास पुढे येण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
मंत्री विखे पाटील यांनी येथील शासकीय विश्राम गृहात सर्व वरिष्ठ पोलीस तसेच महसूल अधिकारी यांची बैठक घेवून आजपर्यत झालेल्या तपासचा आढावा घेतला.अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर अतिरीक्त पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्यासह या संपूर्ण घटनेचा तपास करणारे अन्य अधिकारी उपस्थित होते.
बैठकी नंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,गुंतवणूक करणार्या नागरीकांची संख्या मोठी आहे.केवळ चांगला परतावा मिळेल या अपेक्षेने शिर्डी आणि परीसरासह अन्य काही भागातून तिनशे ते चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असावी असा प्राथमिक अंदाज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फसवणूक करणार्या सर्व व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस यंत्रणेला दिल्या आहेत.यामध्ये शिर्डी संस्थान मधील कर्मचाऱ्यांनी मोठी गुंतवणूक केलेली आहे.परंतू काही कर्मचारीच कंपनीचे प्रतिनिधी म्हणून काम करीत असल्याचे उघड झाल्याने या कर्मचार्यांनी कुठे भाविकांची फसवणूक केली आहे का याचाही तपास होण्याची आवश्यकता आहे.
सध्या सात लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्या सर्वाचे काॅल रेकाॅर्डची तपासणी झाली पाहीजे.गुंतवणूकदारांचे पैसे घेवून कंपनीच्या प्रतिनिधींनी कुठे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार केले असतील तर त्याची चौकशी करून असे व्यवहार तातडीने थांबविण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला दिल्या असल्याचे विखे पाटील म्हणाले.
मात्र गुंतवणूक झालेली रक्कम आणि गुंतवणूकदरांची संख्या पाहाता अद्यापही पाहीजे तेवढे तक्रारदार पुढे यायला तयार नाहीत.त्यामुळे ज्यांची गुंतवणूक झालेली असेल त्यांनी पुढे येवून तक्रार द्यावी त्यांची माहीती गोपनीय ठेवली करावी तक्रार राहाता किंवा शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यासाठी पोलीस यंत्रणेने सहकार्य करण्यच्या सूचना विखे पाटील यांनी दिल्या.
जिल्ह्यातील शेवगाव पारनेर सुपा येथेही आशाच कंपन्या स्थापन करून नागरीकांची फसवणूक झाली याचाही तपास सुरू आहे.शेवगाव येथील घटनेतील आरोपीस न्यायालयाने जामीन नाकारला आहे.
शिर्डीच्या घटनेत यापुर्वी कंपनीच्या लोकांकडून पोलीस यंत्रणेतील काही लोकांनी केलेल्या गैर व्यवहराची माहीती समोर आली आहे.याचीही चौकशी करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.