लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-बारा विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने मोठी प्रगती केली आहे. तांत्रिक शिक्षणाच्या माध्यमातून प्रवरेने आदर्श निर्माण केला. ग्रामीण भागातील शेतकरी आणि सामान्य जनतेच्या मुलांना तांञिक शिक्षण मिळाल्याने ही मुले ही जागतिक पातळीवर आज कार्यरत आहेत. हेच स्वप्न पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे होते आज ते पुर्ण होत आहे. आज प्रवरा ही मुलींच्या शिक्षणामध्ये आघाडीवर आहे. शिक्षणातून पुढे जात असतांना प्रवरेच्या माध्यमातून मिळणारे संस्कार विद्यार्थ्यांनी कायम आठवणीत ठेवावे आणि संस्थाचालक, शिक्षक, पालक विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नातून आदर्श समाज निर्मिती व्हावी अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केली.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील तंत्रनिकेतन, लोणी येथे आयोजित विद्यार्थी-पालक शिक्षण आणि व्यवस्थापन समिती मेळावा आणि शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीचा मेळाव्यात सौ. विखे पाटील बोलत होत्या.यावेळी मिरी येथील जेष्ठ कार्यकर्ते कारभारी गवळी, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. व्ही. आर. राठी, प्रवरा अभियाञिकीचे प्राचार्य डॉ संजय गुल्हाने यांसह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सौ. विखे पाटील म्हणाल्या आज प्रवरेच्या माध्यमातून सर्वसमावेशक शिक्षण दिले जाते. नोकरी उपलब्ध करण्याबरोबरच देशासाठी आदर्श नागरिक घडवण्याचे काम प्रवरेच्या माध्यमातून होत आहे. विद्यार्थ्यासाठी अनेक उपक्रम हे सुरू असतात. शिक्षणाबरोबरच नोकरी आणि रोजगार उपलब्ध करून देण्यातही प्रवरा ही कायमच आघाडीवर राहिली आहे. आज तंत्रनिकेतनचे अनेक विद्यार्थी जागतिक पातळीवरती विविध क्षेत्रात आणि शासकीय सेवेत कार्यरत आहे. आज तंत्रनिकेतनची प्रगती बघता राज्यभरातून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहे. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित कॅम्पस म्हणून प्रवरेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे असे सांगतानाच विद्यार्थ्यांनो आई-वडिलांच्या विश्वासाला तडा जाणार नाही आणि शिक्षणातून आपण या समाजाचा काहीतरी देणे लागतो या भावनेतून शिक्षणातून पुढे जा असेही त्यांनी सांगितले.
पालकांच्या वतीने कारभारी गवळी यांनी मनोगत व्यक्त करतांना प्रवरेच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचे कौतुक करत शैक्षणिक कार्यामुळे अहिल्यानगरह राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी येथे उपलब्ध झाली आहे. राजकारणातून समाजकारण करत असताना समाजाचा आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून विखे पाटील परिवार हा कायमच समाजभिमुख काम करत आहे असे सांगून विखे पाटील परिवाराच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यावेळी सहसचिव भारत घोगरे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
प्रारंभी प्राचार्य डॉ. व्ही. आर. राठी यांनी महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देत असताना हे महाविद्यालय ४४ वर्ष पूर्ण करत आहे. विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देत असतानाच नोकरी उपलब्ध करण्यात हे महाविद्यालय आघाडीवर राहिले आहे. पालकांनीही आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देत आपला पाल्य हा सक्षम कसा होईल यासाठी आम्हाला प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी तंत्रनिकेतन मधील विविध गुणवंत विद्यार्थ्याचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्र. रवींद्र काकडे यांनी तर आभार आभार एन. एम. गरड यांनी मानले.