नांदेड (जनता आवाज वृत्तसेवा):- जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी तातडीने औषधे व जीवनोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. शासनासह विविध सामाजिक संस्थांच्यावतीनेही मदतीचा ओघ पूरग्रस्त गावातील नागरिकांसाठी सुरू आहे.
मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभाव क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुक्रमाबाद, हसनाळ, रावणगाव, भिंगोली, भासवाडी या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुराच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून जीवनावश्यक वस्तू व साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दरम्यान, पालकमंत्री अतुल सावे यांनी #पूर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य उपलब्ध करून दिले आहे. हे साहित्य देगलूरचे उपविभागीय अधिकारी व मुखेडचे तहसीलदार यांना वितरणासाठी सुपूर्द केले असून, त्यांच्यावतीने पूरग्रस्तगावांमध्ये या साहित्याचे वितरण करण्यात येत आहे. या साहित्यात प्रामुख्याने दैनंदिन वापरातील कपडे साडी, टीशर्ट, ट्रॅकपँट, टॉवेल, आणि जीवनावश्यक औषधे पॅरासीटामॉल टेबलेट स्ट्रिप, ओआरएस इ. साहित्याचा यामध्ये समावेश आहे.