spot_img
spot_img

पाथर्डी तालुका हादरला! एकाच दिवशी चार जणांचा आत्महत्येने मृत्यू 

पाथर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- पाथर्डी तालुक्यात काल, बुधवारी घाटशिरस येथे नवविवाहित दांपत्याने झाडाला गळफास घेऊन जीवनाचा अंत केला. तर पाथर्डी शहरातील इंदिरानगर भागात एका २८ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. तसेच साकेगाव येथील ३० वर्षीय युवकाने काही दिवसांपूर्वी विष प्राशन केल्यानंतर बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या चौघांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घाटशिरस येथील भाउसाहेब शिवराम माळी (वय २५) आणि त्यांची पत्नी प्रियंका भाउसाहेब माळी (वय १९) या नवविवाहित दांपत्याने एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोघांचा विवाह केवळ वर्षभरापूर्वी झाला होता. बुधवारी सकाळी गावच्या शिवारात दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे हे करीत आहेत.

दरम्यान, पाथर्डी शहरातील इंदिरानगर भागात संजना सुनिल खुडे (वय २८, रा. नाथनगर) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. संजनाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल वैभव साळवे हे करीत आहेत.

तसेच साकेगाव येथील अंबादास पाराजी वाघ (वय ३०) या युवकाने दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १.१० वाजता विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, पाच दिवस उपचार सुरू असताना बुधवारी (दि. ५ ) पहाटे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन दराडे हे करीत आहेत.

एकाच दिवशी तालुक्यात चार ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!