नेवासे(जनता आवाज वृत्तसेवा):- नेवासे नगरपंचायत निवडणुकीत माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने दमदार कामगिरी करत दहा जागांवर विजय मिळवला असून पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. या निकालामुळे नेवासेच्या राजकारणात गडाख यांचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मात्र, असे असतानाही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार करणसिंह घुले यांनी बाजी मारल्याने या निवडणुकीला वेगळेच राजकीय वळण मिळाले आहे.
नगरपंचायतच्या एकूण जागांपैकी क्रांतिकारी शेतकरी पक्षाला १०, महायुतीला ६ जागा मिळाल्या आहेत. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला असून एका जागेवर आम आदमी पार्टीच्या उमेदवाराने विजय संपादन केला आहे. या आकड्यांवरून स्पष्ट बहुमत गडाख गटाकडे असतानाही नगराध्यक्षपद त्यांच्या हातातून गेल्याची चर्चा सुरू झाल्या आहे.
नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने रणनीतीपूर्ण खेळी करत करणसिंह घुले यांना उमेदवारी दिली. विरोधी गटांतील मतांचे विभाजन आणि अपक्ष तसेच आम आदमी पार्टीच्या भूमिकेमुळे डॉ. करणसिंग घुले यांच्या पारड्यात मतांचा कल गेला. परिणामी, बहुमत नसतानाही महायुतीने नगराध्यक्षपद पटकावून राजकीय वर्तुळात आश्चर्याची लाट निर्माण केली आहे.
या निकालानंतर नेवासे तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे गडाख समर्थकांनी बहुमताचा विजय साजरा केला, तर दुसरीकडे नगराध्यक्षपद हुकल्याने नाराजीही व्यक्त केली जात आहे. अनेक कार्यकर्त्यांनी उघडपणे ‘संख्याबळ असूनही सत्ता पूर्णपणे हातात आली नाही’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, येत्या काळात नगरपंचायतमध्ये सत्तासंघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. बहुमत क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडे असल्याने विकासकामांवरील नियंत्रण त्यांच्याकडे राहणार असले, तरी नगराध्यक्ष महायुतीचा असल्याने निर्णयप्रक्रियेत ताणतणाव दिसून येऊ शकतो.
एकूणच नेवासे नगरपंचायत निवडणुकीने तालुक्याच्या राजकारणाला नवे समीकरण दिले आहे. गडाख यांना बहुमताचा गड मिळाला असला, तरी नगराध्यक्षपदाची जागा महायुतीकडे गेल्याने पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



