नेवासा (जनता आवाज वृत्तसेवा):- सध्या जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून या प्रकारच्या घटनेमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये शासन, पोलीस प्रशासन, त्याचबरोबर महसूल विषयी मोठ्या प्रमाणात रोष वाढत असून कारण गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात अशाच एक प्रकारची घटनेमध्ये एका जणाची हत्या झाली होती . तेव्हाही त्या ठिकाणी मोठा तणावयुक्त वातावरण निर्माण झाले होते.आज नेवासा तालुक्यातील चांदा गाव शिवारात कंदुरी जेवणाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातून एका तरुणाची अग्निशस्त्रातून गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना सायंकाळी घडली.
चांदा येथील आरोपी सुरज लतीफ शेख (वय २३) यांच्या शेतात कंदुरीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी मयत शाहिद राज महंमद शेख (वय २३, रा. चांदा, ता. नेवासा) हा कार्यक्रमस्थळी गेला होता. सायंकाळी सुमारे ४.४५ ते ५.०० वाजण्याच्या सुमारास शाहिद शेख, सुरज लतीफ शेख व अक्षय जाधव यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर गंभीर बनत आरोपींनी अग्निशस्त्रातून फायर करत शाहिद शेख याची निघृण हत्या केल्याचे समजते.
घटनेनंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून घटनास्थळी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने आरोपीला लवकरात लवकर यश येईल अशी अपेक्षा नागरिकांमधून केली जात आहे.



