शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):-ओम साई राम’च्या अखंड जयघोषात आणि भक्तीच्या सागरात न्हाऊन निघालेल्या शिर्डीत यंदाचा साई परिक्रमा महोत्सव अत्यंत उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडला. देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत शिर्डी नगरीत श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
१४ किलोमीटरच्या या परिक्रमेची सुरुवात पहाटे साडेचार वाजता खंडोबा मंदिर परिसरातून झाली. पहाटेपासूनच साईनामाच्या गजराने संपूर्ण शिर्डी दुमदुमून गेली होती. परिक्रमेच्या मार्गावर ठिकठिकाणी भजन, कीर्तन आणि नामस्मरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे भाविकांचा उत्साह अधिकच वाढल्याचे चित्र दिसून आले.
या परिक्रमेतील महिला भाविकांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, संत-महंत तसेच विविध राज्यांतून आलेले साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देश-विदेशातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीमुळे परिक्रमेचे स्वरूप अधिक व्यापक झाले.
लाखो भाविकांची गर्दी असूनही कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. भाविकांच्या सोयीसाठी मार्गावर ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, फराळ तसेच महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
या परिक्रमेवेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः साईबाबांचा रथ ओढत ‘साईबाबा की जय’च्या घोषणा दिल्या. त्यांच्या सहभागामुळे भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शिर्डीच्या पावन भूमीत साई परिक्रमा महोत्सवाचे सातवे वर्ष यंदा अत्यंत दिमाखात साजरे झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
डॉ. विखे म्हणाले की साईबाबांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली, हे आमचे परमभाग्य आहे. साईबाबांचे प्रेम केवळ भारतापुरते मर्यादित नसून ते जगभर पसरले आहे, याची प्रचिती या परिक्रमेतून आली. देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातून मोठ्या संख्येने साईभक्त शिर्डीत दाखल झाले,” असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
भावनिक आणि भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या साई परिक्रमे मध्ये एक लाखांहून अधिक भाविकांनी सहभाग नोंदवत साईचरणी नतमस्तक होत श्रद्धेची प्रचिती दिली.



