संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):– बचत गटाची सीआरपी म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेला दहा महिन्यापासून मानधन मिळाले नाही म्हणून वरिष्ठांकडे मानधनाची मागणी केल्यानंतर तिच्याशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गैरवर्तन करण्यात आले. या गैरवर्तनाची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संगमनेरमधील शेकडो महिला एकत्र येऊन सुमारे ४ तास ठिय्या आंदोलन करूनही पोलीस प्रशासनाने महिलेची तक्रार ऐकून न घेतल्याने सर्व महिला प्रचंड संतप्त झाल्या. महाराष्ट्रात चालले काय ? असा सवाल करताना संगमनेर मधील पंचायत समिती फाईलबाबत अनेक महिलांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.
संगमनेर शहर पोलीस स्थानकासमोर सीआरपी महिलेला न्याय मिळावा याकरता शहर व तालुक्यातील शेकडो महिलांनी एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ पद्माताई थोरात, सौ अर्चनाताई बालोडे, सौ प्रमिलाताई अभंग, सुनिता कांदळकर, दिपाली वर्पे, रोहिणी गुंजाळ, डॉ अनुराधा सातपुते, सुनिता कांदळकर, सुरभी मोरे, सौ निशा कोकणे, संगीता थोरात, सुनिता दिघे, मंगल काकड, अनिता काकड ,वनिता यादव, नंदा यादव, लता यादव, वनिता विधाटे, कल्पना थोरात,निर्मला थोरात,ज्योती थोरात, सविता थोरात,शोभा थोरात,दीपिका थोरात,ऋतुजा थोरात,यमुनाबाई मनले,अलका शिरसाठ, यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.
पंचायत समितीच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या बचत गटांच्या नियंत्रणा करता असलेल्या सीआरपी चे मागील 10 महिन्यापासून मानधन थकलेले आहे. काही महिलांचे मानधन दिले तर काहींचे मागे ठेवले यानंतर संबंधित महिला आपले मानधन मागण्यासाठी गेल्यानंतर तिच्याशी वरिष्ठ अधिकाऱ्याने गैरवर्तन केले. यानंतर ही बाब सदर महिलेने आपली पती व सामाजिक कार्यकर्ते शरद नाना थोरात यांना सांगितल्यानंतर काही युवक कार्यकर्त्यांनी संतापून सदर अधिकाऱ्याला चोप दिला. संगमनेर तालुक्यामध्ये महिलांचा अपमान खपवून घेणार नाही याबाबत युवक आक्रमक झाले.
यानंतर सदर महिला पोलीस स्टेशनमध्ये आपली तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर रात्री दोन वाजेपर्यंत थांबवण्यात आले. कुठून तरी राजकीय फोन आल्याने इतक्या रात्री ती महिला थांबूनही तिची तक्रार घेतली गेली नाही. सकाळी या असे सांगितले. सदर महिला सकाळी ९ वाजता पोलीस स्टेशनला आल्यानंतरही सदर महिलेची तक्रार घेण्यात आली नाही.
यानंतर संगमनेर मधील शेकडो महिला एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केले व पोलीस प्रशासनाने कुणाच्या दबावाला बळी न पडता सदर महिलेची तक्रार नोंदवून घ्यावी व महिलेला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली पोलीस प्रशासनाने मात्र याबाबत अत्यंत उदासीनता दाखवत उडवा उडवीची उत्तरे दिली यानंतर महिला संतप्त झाल्या. प्रचंड घोषणाबाजी केली.
यावेळी बोलताना सौ दुर्गाताई तांबे म्हणाले की, लोकशाही आणि संविधान महिलांच्या रक्षणाकरता आहे मात्र सध्या महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहेत. बेटी बचाव , बेटी पढाव म्हणायचे आणि महिलांवर अन्याय करायचा हा कुठला कायदा आहे. संगमनेर तालुक्यामध्ये बचत गटाचे मोठे जाळे आहे अनेक महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करत आहे मात्र मागील काही दिवसांपासून पंचायत समिती मधून या महिलांना त्रास दिला जातो आहे. महिलांवर अन्याय केला जात आहे या अन्यायाविरुद्ध दाद मागत असेल तर प्रशासनाने सहकार्य केले पाहिजे. तक्रार दाखल करून घ्या अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी विविध महिलांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. साधे फेसबुक किंवा व्हाट्सअप ला लाईक केले तरी गुन्हा दाखल होतो मात्र महिलांवर अत्याचाराची दखल घेतली जात नाही अशी खंत महिलांनी व्यक्त केली.
यावेळी पोलीस प्रशासनाने अत्यंत बेजबाबदारीने उत्तरे दिली .यामुळे महिला अत्यंत आक्रमण झाल्या.
चार तास चाललेल्या या ठिय्या आंदोलनाची बातमी संगमनेर तालुक्यात कळताच संगमनेर तालुक्यातील महिला व नागरिकांमध्ये तीव्र संतोष निर्माण झाला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संगमनेर पंचायत समिती फाइल्स
आशा सेविका ,अंगणवाडी सेविका, यांसह विविध महिला कर्मचारी यांना सातत्याने त्रास दिला जात असून राजकीय कार्यक्रमासाठी त्यांना राजकीय कार्यक्रम बंधनकारक केले जात आहे. त्यांच्या आयोजनासह महिलांकडून राजकीय अजेंडा राबवला जात असून पंचायत समितीमध्ये अनेक फाइल्स सुरू असल्याची दबक्या आवाजात तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे .यापूर्वी अशी परिस्थिती कधीही तालुक्यात नव्हती. संगमनेर तालुक्यात वाळू तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, गुंडागर्दी ,मारामारी, महिलांची वाढलेली असुरक्षितता, जाती धर्मामध्ये भांडणे, हप्ते वसुली अशी परिस्थिती कधीही नव्हती. मात्र आता ती सुरू झाल्याची चर्चा सर्वत्र आहे.



