वैजापूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- राज्यातील सरकारच्या पाठीशी वारकरी संप्रदाय असल्याने वारकऱ्यांच्या मागणी प्रमाणे सर्व सुविधा पुरवू असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
वैजापूर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात ते बोलत होते.ते म्हणाले संत हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात.राज्यात मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय आहे.महाराष्ट्र ही संताची भुमी आहे.संताची मोठी परंपरा येथे आहे.असे यावेळी ते म्हणाले.
हे सरकार वारकरी संप्रदायच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन त्यांना सर्व सोयी सुविधा पुरवणार आहे. छत्रपती संभाजीनगरसह नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील वारकरी व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सरला बेट अर्थात गोदाधामला जाण्यासाठी पक्के रस्ते व अंतर्गत सोयीसुविधांसाठी सुमारे पंधरा कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा शिंदे यांनी यावेळी केली .
येथे आयोजित सदगुरु गंगागिरी महाराज यांच्या १७६ व्या अखंड हरिनाम सप्ताहात रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडुन भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास पालकमंत्री संदिपान भुमरे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, सप्ताह समितीचे अध्यक्ष आमदार रमेश बोरनारे, डॉ. दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती, मधुकर महाराज ,विशाल संचेती,जे के जाधव , विशाल शेळके, मंगेश भागवत आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी मूख्यमंत्र्यांचे स्वागत केले.मुख्यमंत्री येण्याचे अगोदर रामगिरी महाराज यांचे किर्तन झाले.रामगीरी महाराज यांनी सरला बेटाच्या रस्त्यांसाठी व अन्य विकास कामांसाठी निधीची मागणी केली. तसेच रस्ते खराब होत असल्याने गोदाधाम परिसरातील वाळु वाहतूक बंद करावी.अशी मागणी रामगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कडे केली . यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, संत, महात्मेअखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातुन समाजप्रबोधन करत असतात. समाजला दिशा देण्याचे काम करत असतात.
लाखो लोक या अखंड हरिनाम सप्ताहला येऊन गेले. मी भाग्यवान आहे. मला देखील इथे संधी मिळाली. पंढरपुरमध्ये वारकऱ्यांची अडचण येऊ नये म्हणुन पुजेच्या आधी गेलो होतो.. पिण्याचे पाणी स्वच्छता व अन्य सोयीसुविधा दिल्या. हा श्रावण महिना आहे. आपली भुमी संतांची भुमी आहे. नम्रपणे काम करायचं, सर्वसामान्य माणसांच्या दुःखात सहभागी व्हायचे. परमार्थ कसा साधायचा यांचे मार्गदर्शन संत महात्मे करत असतात. हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातुन चांगले विचार ऐकण्यासाठी लोक येत असतात. हे गोरगरीबांचे सरकार आहे, शेतकऱ्यांचे सरकार आहे. आता पर्यंत बारा जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवला. दिड कोटी लोकांनी या निर्णयाचा लाभ घेतला आहे. पावसाने ओढ दिली आहे. पांडुरंगाकडे एवढेच साकडे आहे कि पाऊस चांगला होऊ दे. बळीराजावरचे संकट दुर करेल. हरिनाम सप्ताहामुळे वातावरण बदलते. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. सरकार कधीही शेतकऱ्याना वाऱ्यावर सोडणार नाही. वारकरी संप्रदायाच्या पाठीशी राहण्याची आश्वासन त्यांनी दिले.
वैजापूर येथील अखंड हरिनाम सप्ताहाची वर्ल्ड रेकॉर्ड साठी नोंद झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.या १७६ व्या अखंड हरिनाम सप्ताहात ४ लाख ७५ हजार लिटर आमटी,७८ लाख भाकर,५०१ बुंदीचे लाडु, भाविकांची उपस्थिती याची वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



