कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील रहिवासी व कोपरगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला तरुण समीर राजेंद्र निकोले (वय २४) हा आज दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घरी जात असताना त्यास नगर-मनमाड मार्गावर ‘साई कुबेर सिटी’ या ठिकाणी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूच्या टाटा कंपनीच्या डंपरने (क्र.एम.एच.०६. जी. ७८०२) त्यास उडवले आहे. मात्र त्याने सावधानता बाळगून उडी मारल्याने तो सुदैवाने बचावला असला तरी त्याच्या पायाला दुखापत झाली असून त्याच्या ताब्यातील होंडा एस. एस. हि गाडी मात्र चक्काचूर झाली असल्याची माहिती मुलाचे पिता राजेंद्र निकोले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे. त्यामुळे वाळू चोरांचा उच्छाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
आता नवीन वाळू धोरणानुसार महसूल विभागाच्या माध्यमातून वाळूची विक्री केली जाणार असल्याची घोषणा राज्याच्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी ०१ मे २०२३ रोजी केली होती. त्यामुळे आता वाळू स्वस्तात मिळणे शक्य होणार असा नागरिकांचा विश्वास वाढला होता. यासंबंधी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी वाळूच्या अवैध उत्खनन प्रतिबंधासाठी राज्य सरकार घरपोच वाळू देणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे बांधकाम सुरु असलेले नागरिक खुश झाले होते. मात्र त्याबाबत ग्रामसभेची शिफारस अनिवार्य करण्यात आलेली होती. त्यासाठी महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते या वाळू डेपोंचे उद्घाटन होणार असल्याचा बातम्या प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्ध झाल्या होत्या. कारण चार महिने उलटूनही अद्याप एकाही बांधकाम धारकास हि वाळू तर मिळाली तर नाहीच पण वाळूचोरांनी आपले दर चढे केले असल्याने सदर वाळूला सोन्याचे दर आले आहेत. त्यामुळे कधी काळी वाळूचोर रात्री वाळू वाहत होते मात्र आकाशाला भिडलेले दर पाहून आता ते दिवसाढवळ्या वाळूचोरी करताना दिसत आहे. त्यातून वर्दळीच्या ठिकाणी हि मंडळी चोरीची वाळू वहात असल्याने आपल्या ताब्यातील अवजड वाळूचे वाहन भरधाव वेगाने व बेदरकारपणे चालवताना दिसत आहे. त्यातून अनेक अपघात होताना दिसत आहे. अशीच घटना आज दुपारी २.३० वाजता घडली आहे.
दरम्यान या प्रकरणी त्यांनी आपल्या मुलास वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात भरती केले असून त्यानंतर त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे अशा बेबंद वाहन चालकाविरुद्ध पोलिसानी कडक कारवाई करावी अशी मागणी राजेंद्र निकोले यांनी शेवटी केली आहे. ते कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आहेत.



