लोणी दि.१ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या वीरांचे स्मरण करण्यासाठी ‘मेरी माटी, मेरा देश’ हे अभियान सुरु करण्यात आले आहे.नगर जिल्ह्यात भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जनतेच्या सहभागातून अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महसूल पशुसंर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात मेरी माटी मेरा देश अभियानाचा शुभारंभ आजपासून करण्यात आला. या संदर्भात बोलताना श्री.विखे म्हणाले की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वाड्या वस्त्यांमधून ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर पर्यंत हे अभियान चालणार आहे. अमृत कलशांमध्ये मूठभर माती, धान्य गोळा करून हे कलश ३१ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे अमृतवाटिकेच्या निर्माणासाठी नेले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ ‘अमृत वाटिका’ निर्माणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. अनेक कलशांमधून आणलेल्या माती आणि धान्याचे मिश्रण वापरून या अमृतवाटिकेचे निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले .
विकास पथावर निर्माण होणा-या ‘अमृत वाटिका’ देशातील सर्वात मोठे प्रार्थनास्थळ ठरणार असून अनेक देशी विदेशी पर्यटक इथे भेट देतील. हे संपूर्ण देशाचे अभियान असून त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही विखे पाटील यांनी नमूद केले.
नगर जिल्ह्यात मेरी माटी मेरा देश अभियान प्रत्येक तालुक्यात आयोजित केले जाणार असून, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांचे बलीदान देणारे स्वातंत्र्यवीर, शहीद जवान यांचे स्मरण करून बाबतची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मेरी माटी मेरा देश अभियान यशस्वी करण्यासाठी भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनतेच्या सहभागातून पुढाकार घेण्याचे आवाहन विखे पाटील यांनी केले आहे.



