श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-आधीच पुरेशा दाबाने वीज मिळत नाही. त्यातच आता पाच मेगाव्होल्टचे एक रोहित्र नादुरुस्त झाल्याने बेलापूर वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांना विजेच्या समस्येचा काही दिवस सामना करावा लागणार आहे. बेलापूर येथे वीज उपकेंद्र आहे.या वीज उपकेंद्राअंतर्गत बेलापूर,ऐनतपूर,उक्कलगाव, बेलापूर खुर्द, नरसाळी,वळदगाव,उंबरगाव,पढेगाव, कान्हेगाव,लाडगाव आदी गावातील ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो.सध्या आधीच कमी दाबाने वीज मिळत असल्याने ग्राहक वैतागले आहेत.वातावरणात उष्णता आहे,त्यात पाऊस नाही त्यामुळे वैतागलेल्या जनतेला विजेने त्रस्त केले आहे.कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने एका फिडरवरील पाच ते सहा रोहित्र बंद ठेऊन विजेचा दाब नियंत्रणात ठेवण्याची कसरत कर्मचाऱ्यांना करावी लागत आहे.त्यात बेलापूर वीज उपकेंद्रातील पाच मेगा व्होल्टेजचे एक रोहित्र नादुरुस्त झाल्याने अजूनच अडचणीत भर पडली आहे.या रोहित्रावरील भार अन्य रोहित्रावर टाकून वीज पुरवठा करण्यात येत आहे.मात्र त्यामुळे प्रत्येक फिडरवर तीन चार तास विजेचे सक्तीचे भारनियमन होत आहे.



