टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील १६ चारीला भंडारदरा धरणाचे पाणी सोडावे अशी मागणी माजी सभापती नानासाहेब पवार व उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी महसुल मंत्री, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य, मुंबई तथा पालकमंत्री अहमदनगर ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमुद केले आहे की, टाकळीभान पंचक्रोशीत पावसाने ३० दिवसापेक्षा जास्त दांडी मारली असल्या कारणाने शेतातील उभे पिके जळाली असून पाणी पातळी खालवली असून उच्च दाबाने विज पुरवठा होत नसल्या कारणाने शेतातील उभ्या पिकाला पाणी देणे शक्य होत नाही त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहे.
सद्याच्या परिस्थितीत टाकळीभान टेलटॅक ( गोविंद सागर ) मधून शेतीला आर्वतन सुरु असून टाकळीभान टेलटँकची मुख्य चारी लहान असल्यामुळे तसेच चारी मध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे आहेत या कारणाने पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही त्यामुळे उभ्या पिकाला पाणी मिळण्यास उशीर होत आहे.
शेतकर्यांची हातातोंडाशी आलेली पिके वाचविण्यासाठी टाकळीभान टेलटँक मधून सुरु असलेल्या शेती आर्वतनाला भंडारदरा धरणाचे पाणी चारी नंबर १६ मधून सोडावे जेणेकरून लवकरात लवकर पिकाला पाणी मिळेल व जोपर्यंत सर्व शेतकरी बांधवाचे भरणे होत नाही तोपर्यंत आर्वतन सुरु ठेवावे व संबधित विभागाला आदेश करावे अशी मागणी विखे पाटील यांच्याकडे निवेदनात करण्यात आली आहे.



