राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ) : – कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला थोडा सुद्धा धक्का न लावता गोरगरीब अर्थिक दृष्टया मागास असलेल्या मराठा समाजाला राज्य व केंद्र सरकार यांनी तातडीने सनदशीर मार्ग काढून आरक्षण द्यावे अशी भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) गटाची असल्याची माहिती रिपाईचे जिल्हा सरचिटणीस सिद्धांत सगळगिळे यांनी दिली.
सिद्धांत सगळगिळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, मराठा समाजाला आरक्षण मिळावं हि मागणी सर्वप्रथम रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची वीस वर्षा पासूनची आहे.
ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात रिपाईने वीस वर्षांपासून वेळोवेळी आंदोलने केली आहेत. तसेच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलना दरम्यान झालेला लाठीचार्ज दुर्दैवी असून दोषीवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सिद्धांत सगळगिळे यांनी केली.
तसेच त्यांनी प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले कि, तुम्ही एका रात्रीत नोटा बंद करू शकता, तुम्ही पहाटे शपथा घेऊ शकता, रातोरात नवीन सरकार स्थापन करू शकता, मग मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी इतका विलंब कशासाठी? असा सवाल सर्व संबंधितांना उपस्थित करून जो पर्यंत अर्थिक दृष्ट्या मागास गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत रिपाई ( आठवले गट ) मराठा समाजा बरोबर असल्याची भूमिका रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची आहे, असे रिपाईचे जिल्हा सरचिटणीस सिद्धांत सगळगिळे यांनी पत्रकात म्हटले आहे.



