कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी आ. आशुतोष काळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून मतदार संघासह कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलविला आहे. कोपरगाव शहराच्या विकासाचे मागील अनेक वर्षापासुनचे प्रलंबित प्रश्न देखील सोडविले आहेत. यापुढील काळात कोपरगावकरांच्या विकासाच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी सोमवार (दि.१८) रोजी कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे दुपारी ३.०० वाजता आ.आशुतोष काळे कोपरगावकरांशी संवाद साधणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी चार वर्षात २३०० कोटीचा निधी मिळविला असून कोपरगाव शहराच्या विकासासाठी देखील जवळपास ३०० कोटी निधी देऊन कोपरगाव शहराचा देखील चेहरा मोहरा बदलवून वर्षानुवर्षापासून कुणालाही न सोडविता आलेला अत्यंत महत्वाचा असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावून दिलेल्या वचनाची पूर्तता केली आहे. त्याबरोबर कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास करतांना सर्व प्रमुख रस्ते, शासकीय इमारती, ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत व कर्मचारी वसाहत, सामाजिक सभागृह, अमरधाम,कब्रस्थान विकास, उद्यान विकास अशा विविध विकास कामांना कोट्यावधी निधी दिला आहे. ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेचे काम प्रगतीपथावर असून बहुतांश रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या सर्व सुरू असलेल्या विकास कामांसंदर्भात तसेच प्रलंबित असलेल्या विकास कामाच्या प्रश्नांसंदर्भात कोपरगाव शहरवासीयांच्या सूचना जाणून घेण्यासाठी हा जनसंवाद आयोजित केला आहे. शहरवासीयांनी मोठ्या संख्येने या संवाद कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.