आश्वी दि.१३( जनता आवाज वृत्तसेवा ):-धमक्या देवून सरकारच्या विकास कामांचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न तालुक्यात सुरु आहे. पण आता धमक्या देण्याचे दिवस संपले आहेत. विकास कामे कोणामुळे होत आहेत हे जनतेला समजत आहे. राज्यात जनतेच्या मनातील सरकार असल्याने जनतेच्या हिताची कामे होत आहेत. विकास हा धमक्या देवून नव्हे तर लोकांना विश्वासत घेवून करावा लागतो असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
*विकास हा धमक्या देवून नव्हेतर लोकांना विश्वासात घेवून करावा लागतो – मंत्री विखे पाटील * *धमक्या देण्याचे दिवस आता संपले विकास कामे कोणामुळे सुरु आहेत हे जनतेला माहीतमंत्री विखे पाटील यांचा आ.थोरातांना टोला*
तालुक्यातील चिंचपूर येथे केंद्र सरकारला ९ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाजनसंपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे. चिंचपूर येथील कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचे पत्रक नागरीकांना देण्यात आले. भाजपाचे तालुका अध्यक्ष सतिष कानवडे, डॉ.विखे पाटील कारखान्याचे संचालक कैलासराव तांबे, प्रवरा बॅकेंचे संचालक बबनराव काळे, गिताराम तांबे, सादतपुरचे सरपंच नारायण गुंजाळ,औरंगपूरच्या सरपंच लक्ष्मीबाई वाकचौरे, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसिलदार धिरज मांढरे, गटविकास आधिकारी अनिल नागणे यांच्यासह विविध विभागांचे आधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीमुळे संपूर्ण देशात जलजीवन मिशन योजनेचे काम वेगाने सुरु आहे. २०२४ सालापर्यंत प्रत्येक घरात नळाव्दारे पाणी देण्याचे सरकारचे धोरण आहे. चिंचपूर आणि पंचक्रोशितील पाणी योजनेकरीता निधीची उपलब्धता झाली आहे. या योजनेकरीता डॉ.विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने जागेची उपलब्धताही करुन दिली. परंतू आता या योजनेचे श्रेय लाटण्यासाठी काहींची केवीलवाणी धडपड सुरु झाली आहे. धमक्या देण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. परंतू आता धमक्या देण्याचे दिवस संपले आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे, धमक्या देणा-यांवर तातडीने कारवाई करावी अशा सुचना आपण आधिका-यांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
शिर्डी विधानसभा मतदार संघात तालुक्यातील गावांचा समावेश झाल्यानंतर विकासाची प्रक्रीया वेगाने घडत आहे. यापुर्वी या गावांमधील रस्त्यांची आवस्था कशी होती हेही आपण पाहीले आहे. ज्यांनी एक टोकरी मुरुमही दिला नाही तेच आता येथे येवून विकासाच्या गप्पा मारत आहेत. परंतू विकासाची कामे कोण करीत आहे हे जनता चांगल्या पध्दतीने जाणून आहे. मागील अडीच वर्षात ठप्प झालेली विकासाची प्रक्रीया आता सेना भापचे सरकार आल्यानंतर गतीमान झाली आहे. आता लोकांना सरकारच्या दारात जावे लागत नाही. शासनच आता जनतेपर्यंत पोहोचत आहे.
व्यक्तिगत आणि सार्वजनिक प्रश्नांची सोडवणूक शासन आपल्या दारी उपक्रमातून होत आहे. या उपक्रमाची मुदतही आता सरकारने वाढविली असून, लाखो लोकांचे प्रश्न या माध्यमातून सुटत असल्याचे समाधान आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभही राज्य सरकारच्या माध्यमातून जनतेला देण्याचा प्रयत्न सुरु असून राज्य सरकारने शेतक-यांकरीता एक रुपयात पिक विमा देण्याची योजना सुरु केली आहे. केंद्राच्या धर्तीवर ६ हजार रुपयांच्या योजनेचीही अंमलबजावणी लवकरच सुरु होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
भाजपाचे तालुका अध्यक्ष सतिष कानवडे यांनी महाजनसंपर्क अभियानाची माहीती देवून केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. राहाता आणि संगमनेर तालुक्यात विकास कामांची तुलना करताना मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून विकासाची प्रक्रीया वेगाने घडत आहे. त्यांच्या मंत्री पदाच्या कार्यकाळात संगमनेर तालुक्याला वेगवेगळ्या योजनांचा मोठा निधी उपलब्ध होत असून, सामान्य जनतेचे प्रश्नही मार्गी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. संचालक कैलास तांबे यांनी चिंचपूर गावासाठी उपलब्घ झालेल्या निधीची माहीती आपल्या भाषणात दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार धिरज मांढरे यांनी केले. या कार्यक्रमा चिंचपूर आणि पंचक्रोशितील ग्रामस्थ, शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



