संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- संगमनेर तालुक्यातील झोळे येथील तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दि.( ३१) ऑक्टोबर रोजी पहाटे घडली आहे.सागर भाऊसाहेब वाळे वय (२५) रा.झोळे ता. संगमनेर असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. सागरने आत्महत्या करतेवेळी आपल्या खिशामध्ये एक मराठा लाख मराठा अशा प्रकारच्या उल्लेख असलेली चिठ्ठी ठेवली होती.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,सागर वाळे हा तरूण झोळे येथे राहात असून तो संगमनेर येथे काम करत आहे. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे घरातील सर्व जेवण करून झोपले होते. मंगळवारी पहाटे सागर हा घराच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली आहे .दरम्यान त्याठिकाणी एक वही सापडली असून त्यामध्ये आम्ही जातो आमच्या गावा,एक मराठा लाख मराठा आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे. कोणाला जबाबदार धरू नये. एक मराठा लाख मराठा. आपला लाडका सागर मराठा असा उल्लेख चिठ्ठीत केलेला आहे.
दरम्यान घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे उपनिरीक्षक इस्माईल शेख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाचा मृतदेह खाली घेतलाआणि शवविच्छेनासाठी संगमनेर कुटीर रूग्णालयात पाठवण्यात आला होता. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.दरम्यान सागर वाळे या तरूणाच्या आत्महत्येमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान कुणीही आत्महत्या करू नये असे आवाहन मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.अनेक वेळा विनंती करूनदेखील तरुण आत्महत्या करीत आहे. आरक्षण कुणासाठी असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. माझ्या मागे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केलेलं आहे. परिसरातील लोकांनी शासन अजून किती बळी घेणार या प्रकारची चर्चा करताना दिसून आले. शासनाने लवकरात लवकर ठोस असे पाऊल उचलावे ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.



