नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):- महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या जाचक अटी व नव्याने तयार केलेल्या कायद्याचा निषेध म्हणून नेवासा, नेवासा फाटा व तालुक्यातील सर्व कृषी केंद्र चालकांनी गुरुवार (ता. २) पासून पुकारलेल्या बंदमुळे खते, बी-बियाणे व औषधांसाठी शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. कृषी केंद्रात विक्रीसाठी असलेल्या सर्व बंद पाकिटातील शेतीपूरक बियाणे, औषधे व खतांबाबत शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास दुकानदार जबाबदार राहील, असा कायदा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र फर्टिलायझर असोसिएशन संघटनेने शासनास निवेदन देऊन तीन दिवस सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयानुसार नेवासा शहर,नेवासा फाटा,सोनई, घोडेगाव, चांदे, वडाळा व परिसरातील सर्व दुकाने बंद आहेत. सध्या रब्बी पेरणीचा मोसम असल्याने कृषी केंद्र बंदचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शासनाच्या गुणवत्ता नियंत्रकद्वारे विविध कंपन्यांचे बियाणे व औषधास शासन परवानगी देते,
मग त्यातील त्रुटींवर दुकानदारास जबाबदार धरणे चुकीचे आहे. या कायद्याने दुकानदार उद्ध्वस्त होतील, असे केंद्रचालक दादासाहेब खोसे यांनी सांगितले.



