मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा) समृद्धी महामार्गावर रात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 33 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यातील 8 प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. या अपघातावरुन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात 26 जणांचा दुर्दैवी अंत झाला. हे वृत्त मन हेलावणारे आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरूच आहेत. आतापर्यंत 300 हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले. सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत! बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जिवांना मी श्रद्धांजली अर्पण करीत आहे, असे ठाकरे म्हणाले.