श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):-श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर खंडाळ्यात उसाने भरलेला ट्रक पलटी झाल्यामुळे रस्त्यालगत चाललेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दोघे पुरुष जखमी झाल्याची घटना काल (शनिवार ) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
उसाने भरलेला (एम.एच.१२ एच.सी.९६६६ ) हा दहा टायर ट्रक श्रीरामपूरकडून बाभळेश्वरकडे ६ वाजण्याच्या सुमारास जात होता. खंडाळ्यातील गणपतीमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कमानीजवळ ट्रक आल्यानंतर डाव्या बाजूला झुकून पलटी झाला.त्याचवेळी रस्त्याच्या कडेने जाणारी खंडाळा येथील रहिवासी उषाबाई बाळासाहेब विघावे ही महिला ट्रकमधील उसाखाली दाबली गेली.तसेच मोटारसायकलवर जाणारे नर्सरी (बेलापूर) येथील दोघेजण जखमी झाले. मोठ्या वर्दळीत अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.घटनेत उसाखाली दबलेल्या महिला व पुरुष यांना काढण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न करून महिलेला तसेच दोन्ही जखमींना बाहेर काढले.
यावेळी श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावरील वाहतूक लांब अंतरापर्यंत ठप्प झाली होती.यावेळी पोलीस यंत्रणेकडून वाहतूक काही काळ थांबून सुरळीत करण्यात आली.
नगर मनमाड रस्त्याची दुरुस्ती तसेच कोल्हार येथील पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक बाभळेश्वर मार्गे श्रीरामपूर अशी वळवण्यात आली आहे.त्यामुळे रहदारी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.




