लोणी, दि. २७ ( जनता आवाज वृत्तसेवा):- ग्रामीण भागातील बिबट्यांचा वाढता संचार आणि भविष्यातील धोके रोखण्यासाठी वन विभागाने जिल्ह्यात कायमस्वरुपी रेस्क्यु टिम निर्माण करावी. यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा विकास नियोजन समितीतून देण्यात येईल अशी ग्वाही महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
काही दिवसांपुर्वीच सादतपुर येथे हर्षल गोरे या ५ वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केला. या घटनेत या बालकाचा मृत्यू झाला. मंत्री विखे पाटील यांनी आज गोरे कुटूंबियांचा भेट घेवून त्यांना दिलासा दिला आणि या भागातील ग्रामस्थांशी संवाद साधला. बिबट्यांच्या वाढत्या त्रासाबद्दल ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींचे गांभिर्य ओळखून मंत्री विखे पाटील यांनी वन विभागाला बिबट्यांच्या शोधासाठी अधिक साधन साहित्य उपलब्ध करण्याच्या सुचना दिल्या.
सादतपुर येथे सध्या वन विभागाच रेस्क्यु टिम कार्यरत करण्यात आली आहे. या टिमकडूनही मंत्री विखे पाटील यांनी माहीती जाणून घेतली. बिबट्याच्या शोधासाठी ही रेस्क्यू टिम रात्रंदिवस काम करीत आहे. थर्मल ड्रोनच्या माध्यमातून काही भागातील बिबट्यांचा संचार आढळून आल्याचे या टिम मधील प्रतिनिधींनी सांगितले.
जिल्ह्यातील बिबट्यांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वन विभागाने अधिक यंत्रणा कार्यरत करण्याच्या सुचना मंत्री विखे पाटील यांनी वन विभागाच्या आधिका-यांना दिल्या. बिबट्याच्या शोधासाठी बाहेरून टिम बोलवाव्या लागतात. परंतू भविष्यातील धोके ओळखून वन विभागाने जिल्ह्याची एक टिम तयार करावी यासाठी आवश्यक असलेल्या साधन सामग्रीसाठी निधी उपलब्ध करुन देवू, यासाठी तातडीने प्रस्ताव पाठविण्याबाबत त्यांनी जिल्हा वन संरक्षण आधिकारी सौ.सुवर्णा माने यांना दिल्या. भारनियमना बाबतही ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींबाबत वन विभागाने जिल्ह्यातील बिबट्यांच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडे भार नियमानाच्या वेळा बदलण्याबाबतचा प्रस्तावही तातडीने सादर करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत.



