जालना (जनता आवाज वृत्तसेवा):- मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे जालना येथे सराटी गावामध्ये उपोषणाला बसले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात व सगेसोयरे याबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा.
महाराष्ट्र सरकार कुठेतरी वेळ काढू पणा करत आहे असे त्यांनी अनेकदा बोलून दाखवलेले आहे. त्यामुळे त्यांनी १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक पुकारली आहे. मराठा आरक्षणाकरिता एका जिवापेक्षा करोडो जीव महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले आहेत. या आंदोलनास पाठिंबा म्हणून मराठा समाजाने सरकारच्या निषेधार्थ १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
जरांगे पाटलांना पाठिंबा देत मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांची भूमिका आहे. त्यामुळे आज ते जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करायला आले होते. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव जरांगेंनी भेट नाकारली. मात्र, सरपंच पांडुरंग तारख व इतरांशी चर्चा करून राठोड यांनी जरांगे यांना शुभेच्छा दिल्या.
५० विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू शनिवारपासून आंतरवाली सराटीत पुन्हा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला फेलोशिपपासून वंचित ५० विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला आहे. फेलोशिप मिळावी, या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे आज रविवार, ११ पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.