लोणी दि.१५ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-संगणक युगात संगणक प्रणालीची व्याप्ती कमालीची वाढली असल्याने विकासाला गती मिळाली आहे. तसेच आता कृत्रिम बुध्दीमत्तेच्या युगाची सुरुवात झाली आहे आणि अल्पावधित कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे उद्योग क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. त्यामुळे संगणक शास्त्र आणि कृत्रिम बुद्धीमत्ता शिक्षण क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहणार असल्याचे मत पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. राठी यांनी केले.
लोणी. (ता राहाता) येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पॉलिटेक्निकच्या वतीने मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपमेन्ट या विषयावर दोन दिवसीय शिक्षक विकास कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोल होते. यावेळी प्रशिक्षक प्रा, डॉ. वैशाली विखे, प्रा. संदीप पाटील, प्रा. रितेश होन, संगणक विभाग प्रमुख प्रा. रविंद्र काकडे, प्रा. राजेंद्र निंबाळकर, डॉ. प्रताप विखे, प्रा. एकनाथ घोगरे, समन्वयक प्रा. वसिम तांबोळी उपस्थित होते.
डॉ. राठी म्हणाले की, कृत्रिम बुद्धीमत्तेचा शिक्षकांनी आजच्या विद्यार्थ्यांना पटवून देणे गरजेचे असुन समाज हितासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशिल राहून देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रविंद्र काकडे यांनी केले. यावेळी डॉ वैशाली मांढरे-विखे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त आल्याबद्दल डॉ. प्रताप विखे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यशाळेसाठी प्रा.ए.ए. शेख, प्रा. प्रमोद गाडेकर यांनी परिश्रम घेतले.