लोणी दि.१५ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-चुकीच्या विचारांचे खंडन करण्याची प्रेरणा गीतेतून मिळते.राम आणि कृष्ण ही भारताची ओळख असून तीच विचार आणि आचारांची भारतीय संस्कृती आहे असे असे सांगताना गुरू आणि ग्रंथ नसतील तर ज्ञानाच्या दृष्टीने जग अंधकारमय असेल असे प्रतिपादन वरदविनायक सेवाधामचे मार्गदर्शक ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक,नेवासेकर यांनी केले.
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील वरदविनायक सेवाधाममध्ये आयोजित गणेश जयंती उत्सवाच्या काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, विखे कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उद्धव महाराज पुढे म्हणाले की,राम व कृष्ण हे भारताची ओळख आहेत.कृष्णाचे विचार व रामाचे आचार हीच भारतीय संस्कृती आहे.विचारांचे आदर्श म्हणजे श्रीकृष्ण व मानवी जीवनाचे मूल्य जपणारे श्रीराम हे आहेत. श्रीमद् भगवद् गीता ही अनेकांना प्रेरणा देते. चुकीच्या विचारांचे खंडन करण्यासाठी उपयोगी पडते.तसेच गुरू व ग्रंथ नसतील तर जग हे ज्ञानाच्या दृष्टीने अंधकारमय असेल. ग्रंथाचे खुप उपकार आहेत. हरिकथा विचार देते, सांभाळते व सत्मार्गाला लावते. आध्यात्मिक सेवेशिवाय आपल्याला सुख प्राप्त होणार नाही. हरिकथा आपल्याला स्वानंदी समाजाकडे घेऊन जाते. फिरलेला माथा नीट करायचा असेल तर तुकोबारायांची गाथा जवळ असणे खूप गरजेचे आहे. देव पूजेला वेळ द्या, नामस्मरण करा, त्यामूळे दिवसभर मनोबल राहील व चांगली कामे होतील. ईश्वरी सेवेमध्ये झोकले पाहिजे तसेच जी जबादारी घेतली ती पूर्ण केली तर आनंदी रहाल अशा मौलिक शब्दात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
काल्याचे किर्तनानंतर उत्सवातील सेवा कार्यात सहभाग देणाऱ्या कीर्तनकार,गायक,वादक,भजनी मंडळ,अन्नदाते व विविध सेवेचे योगदान देणाऱ्या दानशूर व्यक्तींचा सत्कार उद्धव महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.साईछत्र उद्योग समूहाचे संचालक गणपतराव भोसले यांच्या वतीने उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला. कचरू महाराज निर्मळ,भारत महाराज धावणे,दीपक महाराज देशमुख,बाबा महाराज मोरे,नामदेव महाराज शास्त्री,गोरक्ष महाराज देठे व वरदविनायक सेवाधाम परिवाराने महोत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.