राहुरी, ( जनता आवाज वृत्तसेवा ):-मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दोन वर्षांपूर्वी ३० किलोमीटर रस्त्यांच्या कामांना मंजुरी घेतली. त्यांतील कामाचा आज शुभारंभ केला. वास्तविक दरवर्षी ३० किलोमीटर रस्ते होणे अपेक्षित होते. परंतु, मागील दोन वर्षात नवीन एक किलोमीटर काम मंजूर झाले नाही. सरकार बदलण्याच्या व फोडाफोडीच्या कामात सरकारचे जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
चिंचाळे (ठाकरवाडी) येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ प्रसंगी आमदार तनपुरे बोलत होते. उपअभियंता रवींद्र संसारे, उपसरपंच घमाजी जाधव, कोंडीराम वडितके, आबासाहेब गडधे, बाबासाहेब तमनर, नवनाथ कोळसे, सतीश बाचकर, दामू काळे, गंगाधर गडधे, सुरेश निमसे, संदीप कदम, पप्पू माळवदे, निवृत्ती घनदाट, काशिनाथ डव्हाण, रामदास जाधव उपस्थित होते.
आमदार तनपुरे म्हणाले, “सरकार बदलले नसते. तर राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघात आणखी ६० किलोमीटर रस्त्यांची कामे झाली असती. दोन वर्षापूर्वी महाविकास आघाडीच्या काळात मंजूर केलेल्या ३० किलोमीटर रस्त्यांची निविदा प्रक्रिया होण्यासाठी रस्ता रोको आंदोलने, उच्च न्यायालयात लाभार्थी ग्रामस्थांतर्फे याचिका असा संघर्ष करावा लागला.
“”हर घर जल. अशी प्रधानमंत्र्यांची घोषणा आहे. परंतु, चिंचाळे-गडधे आखाडा जलजीवन मिशनच्या मूळ आराखड्यात कवठेवाडी व सोंडेवाडी या दोन ठाकरवाड्या वगळल्या. त्या वाढीव आराखड्यात घेतल्या आहेत. परंतु, मंत्रालयात मंजुरी मिळेपर्यंत सरकार व मुख्यमंत्री बदलतील. मूळ आराखड्यात लोखंडी ऐवजी पीव्हीसी जलवाहिनी घेतली आहे.” “खडकाळ भागात उघडी राहणारी पीव्हीसी जलवाहिनी फुटणार आहे. आदिवासी नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार आहेत. जल जीवन मिशन चेष्टेचा विषय ठरत आहे.” असेही आमदार तनपुरे यांनी सांगितले.
मुलींची पायपीट थांबवा …….
चिंचाळे-गडधे आखाडा व परिसरातील ठाकर वाड्यांमधील ५० पेक्षा जास्त मुली राहुरी शहरात शिक्षणासाठी जातात. एसटी बस राहुरी- ताहाराबाद रस्त्यावर चिंचाळे फाटा येथे थांबते. तेथून चार किलोमीटर पायपीट करावी लागते. चिंचाळे गावात एसटी बस गेल्यास मुलींची पायपीट थांबेल. असे साकडे ग्रामस्थांनी आमदार तनपुरे यांना घातले.