राहाता, दि.२३,( जनता आवाज वृत्तसेवा ):-केंद्र आणि राज्य सरकारने सुरु केलेल्या सर्वाधिक योजनांमधून महिलांना नवा आत्मविश्वास मिळाला आहे. या योजनांच्या माध्यमातून महिलांची प्रतिष्ठा उंचावण्याचा यशस्वी प्रयत्न मागील १० वर्षात झाला असल्यामुळे मातृशक्तीचा आशिर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी भक्कमपणे राहील असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सौ.चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.
उत्तर नगर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शक्तीवंदन महिला मेळाव्यात चित्रा वाघ यांनी मार्गदर्शन केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा त्यांनी आपल्या भाषणात घेतला. भाजपाच्या प्रदेश सचिव सौ.माधुरी पालवे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, सरचिटणीस नितीन दिनकर, जिल्हाध्यक्षा सौ.कांचन मांढरे यांच्यासह जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्या याप्रसंगी मोठ्या संख्यने उपस्थित होत्या. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी तसेच आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनाबद्दल सत्कार सोहळे रद्द करुन, या मेळाव्यात श्रध्दांजली वाहण्यात आली.
आपल्या भाषणात केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रत्येक योजनेतून सामाजिक बांधिलकीच आधोरेखित झाले असल्याचे सांगून चित्रा वाघ म्हणाल्या की, गेली अनेक वर्षे या देशातील महिलांना शौचालय सुध्दा यापुर्वी कोणी दिले नव्हते. ग्रामीण भागात बेटी बचाव बेटी पढाव हा संदेश देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांची प्रतिष्ठा वाढविण्याचा प्रयत्न केल्यामुळे देशाची मान सुध्दा उंचावली असल्याचे सांगितले. जन्मापासून ते लखपती दीदी योजनेपर्यंत महिलांना आता योजनारुपी सुरक्षा कवच केंद्र सरकारने दिले आहे. यामुळेच आता पंतप्रधान आवास योजनेतील घरं आता महिलांच्या नावावर होवू लागली आहेत.
प्रधानमंत्री अन्न सुरक्षा अभियानातून मोफत धान्य देवून केंद्र सरकारने या देशातील कोणताही माणूस उपाशी राहू नये ही भूमिका घेतली. महिलांना घरा बाहेर पडा आणि स्वत:चा उद्योग सुरु करुन स्वावलंबी व्हा हे प्रोत्साहन प्रधानमंत्र्यांनी दिल्यामुळेच प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची व्याप्ती अधिक व्यापक झाली आहे. महिलांमध्ये निर्माण केलेला हा आत्मविश्वास नारीशक्तीला स्वावलंबी करण्यासाठी उपयुक्त ठरला आहे.
राज्य सरकारनेही आता महिलांसाठी सुरु केलेल्या योजना या आत्मविश्वास वाढविणा-या आहेत. या योजनांची प्रभावी झालेल्या अंमलबजावणीमुळे मातृशक्तीचा आशिर्वाद नरेंद्र मोदींच्या पाठीशी कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त करतानाच या योजना घराघरात पोहोचविण्यासाठी आता महिलांनी सक्रीय होण्याची गरज आहे. नरेंद्र मोदी आणि कमळाचे फुल एवढाच संदेश देवून घराघरात जाण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी राजकीय सामाजिक जीवनात धाडस दाखवून महिलांनी काम करणे आवश्यक आहे. प्रत्येक महिलेच्या अंगी असलेल्या गुणामुळे ही महिला आपले वेगळेपण सिध्द करु शकते. महिला बचत गटांची चळवळ ही महिला शक्तीला मोठा आधार ठरली असून, या माध्यमातून अनेक महीला आज स्वावलंबी झाल्या असल्याचा उल्लेख त्यांनी केला. प्रदेश सचिव सौ.माधुरी पालवे यांचेही यावेळी भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सौ.कांचन मांढरे यांनी केले.




