कोल्हार ( प्रतिनिधी ):- राज्य शासनाच्या खरीप पीक स्पर्धेत (सोयाबीन) राहुरी तालुक्यातील रामपूर येथील तुषार तनपुरे या शेतकऱ्यास प्रथम क्रमांक मिळाला.
मागील २०२१ – २२ खरीप हंगामात तुषार रावसाहेब तनपुरे यांनी टी. एस. एस. ५०० हे नवीन सोयाबीनचे वाण तयार करून १ हेक्टरमध्ये ४५ क्विंटल उत्पादन घेतले. मागील खरीप हंगामात लागवडीपासून ते पीक काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे फुलगळ झाली. परिणामी झाडावर शेंगा कमी लागल्या.
या वाणाची लागवड २ फुटी सरी पाडून दोन झाडातील अंतर १ फुटाचे ठेवून टोकन पद्धतीने मजुरांकडून लागवड केली. लागवडीपूर्वी त्यांनी बीजप्रक्रिया केल्याचे सांगितले. तसेच या वाणास काढणीला उशीर जरी झाला तरी शेंगा फुटत नाहीत. योग्य हवामान, योग्य औषध फवारणीचे व्यवस्थापन केल्यास एकरी २५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते, असा विश्वास तुषार तनपुरे यांनी व्यक्त केला. याकामी त्यांना सहाय्यक कृषी अधिकारी तान्हाजी शेळके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
चालू खरीप पीक आढावा बैठकीमध्ये पंचायत समिती सभागृहात आमदार प्राजक्त तनपुरे, तहसीलदार चंद्रजित राजपूत, गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, पोपट नवले, सुधीर शिंदे तसेच सहाय्यक कृषी अधिकारी तान्हाजी शेळके यांच्या उपस्थितीत तुषार तनपुरे यांचा प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.



