कोपरगाव ( जनता आवाज वृत्तसेवा ):-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्य प्रगती करत असतांना महिलांचा सन्मान करत महिला दिनी राज्य सरकारने मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महिलाविषयक चौथे धोरण जाहीर केले, त्यांचा हा निर्णय स्वागताहार्य असल्याची प्रतिक्रिया कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी दिली आहे.
मा.आ. कोल्हे म्हणाल्या की, राज्याचे पहिले महिला धोरण सन १९९४, दुसरे २००१ व तिसरे २०१३मध्ये जाहीर करण्यात आले होते. तिसरे महिला धोरण जाहीर होऊन दहा वर्षांचा कालावधी उलटल्यामुळे चौथ्या महिला धोरणाची आवश्यकता होती. महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी या चौथ्या महिला धोरणाची घोषणा शुक्रवारी केली.
या धोरणात अष्टसूत्रीवर भर देण्यात आला आहे. यात आरोग्य, पोषण आहार व स्वास्थ्य, शिक्षण व कौशल्य, महिलांप्रति सर्व प्रकारच्या हिंसाचाराला आळा घालणे या तीन बाबींसोबतच लिंग समानतापूरक उपजीविकेची साधने वृद्धिंगत करण्यात रोजगार, उद्योजकता व कौशल्य विकास, परिवहन, निवारा व स्वच्छताविषयक सुविधा, प्रशासन व राजकीय सहभाग, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, हवामानबदल अनुकूलन व आपत्ती व्यवस्थापन व इतर महत्त्वाची क्षेत्रे अशा आठ मुद्द्यांवर जोर देण्यात आला आहे. तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी अल्प (सहा महिने ते एक वर्ष), मध्यम (एक वर्ष ते तीन वर्ष) आणि दीर्घ (तीन ते पाच वर्षे) अशी कालमर्यादा ठेवण्यात आली आहे.
या माध्यमातून महिलांचे स्वमालकीचे हॉटेल्स असतील त्यांना व्यावसायिक करात १० टक्के सूट मिळणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात १० टक्के आरक्षण ठेवले जाणार आहे. महिलांचे नेतृत्व असणाऱ्या उद्योगासाठी भूखंड दिले जाणार आहेत. तर आरक्षित प्रवर्गातील महिलांना भूखंडात प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच क्रीडा, कला, व्यावसायिक, विज्ञान, शिक्षण क्षेत्रात महिला व मुलींसाठी ३० टक्के आरक्षण दिले जाणार आहे. असे चौथे धोरण जाहीर केले.
राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचा हा सन्मान करून जी भेट दिली आहे. ती उल्लेखणीय आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी उचललेलं हे पाऊल राज्याच्या प्रगतीकडे नेणारे ठरणार आहे. त्यामुळे राज्य सरकार हा निर्णय निश्चीतपणे स्वागताहार्य आहे. या सरकारचे महिला म्हणूण जाहीर आभार ही मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी मानले आहे.