यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे 78 व्या जयंतीनिमित्त विलासरावजी देशमुख यांना अभिवादन करण्यात आले यावेळी समवेत मा. आ. डॉ. सुधीर तांबे ,बाबासाहेब ओहोळ, मिलिंद कानवडे ,रामहरी कातोरे, ॲड. सुहास आहेर, सुभाष सांगळे ,ह भ प नवनाथ महाराज आंधळे, दत्ता कोकणे, रमेश गफले ,आनंद वर्पे, सुरेश झावरे, ऋतिक राऊत, डॉ तुषार दिघे, श्रीराम कु-हे ,रमेश नेहे, तात्याराम कुटे, निलेश थोरात, सचिन खेमनर आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
स्व. विलासराव देशमुख यांचे महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान– आ. थोरात संगमनेरकरांनी जागवल्या विलासरावांच्या स्मृती
संगमनेर (प्रतिनिधी):-राज्यातील सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांसाठी अत्यंत धडाडीचे निर्णय घेणारे आणि कायम हसतमुख व बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचे महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान राहिले असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याबरोबर काम करण्याची अनेक वर्ष संधी मिळाली. त्यांनी आपल्यावर कायम विश्वास टाकला. राज्यात विविध विकासाच्या योजना राबवताना त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देऊन सर्वांना बरोबर घेत काम केले.
साहित्य, कला, क्रीडा, नाट्य सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केला .प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान, भाषेवर प्रभुत्व, कलागुण संपन्न व्यक्तिमत्व यामुळे विलासराव देशमुख राज्याच्या राजकारणात नेहमीच अग्रभागी राहिले. राज्याचे नेतृत्व करताना सर्वच पक्षाचे नेत्यांबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले. राजकारणापलीकडे दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणून विलासराव संपूर्ण राज्याला परिचित आहेत.
सतत कार्य मग्न राहून आलेल्या प्रसंगांना आपल्या खास शैलीतून समोर जाण्याची त्यांची पद्धत वेगळी होती. राज्याबरोबर देशपातळीच्या राजकारणातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता.
नगर जिल्ह्याबरोबर संगमनेर तालुक्यावर त्यांनी कायम प्रेम केले. मला अगदी परिवारातील सदस्य म्हणून त्यांनी मान सन्मान दिला. निळवंडे धरणासाठी मोठी मदत करताना शहरासाठी ऐतिहासिक पाईप लाईन अवघ्या दोन मिनिटात त्यांनी मंजूर केली. हसतमुख व रुबाबदार व्यक्तिमत्व असलेले स्वर्गीय विलासराव देशमुख हे काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी कायम प्रेरणास्त्रोत ठरले असल्याचे गौरवउद्गार यावेळी त्यांनी काढले
तर माजी आ डॉ तांबे म्हणाले की ,दिलखुलास व्यक्तिमत्व, अफाट स्मरणशक्ती, कामाचे आकलन करून त्वरित निर्णय घेण्याची पद्धत यामुळे स्वर्गीय विलासराव देशमुख लोकप्रिय नेते ठरले .काँग्रेस पक्षासह सर्वांना भावनारा लोकप्रिय नेता ही त्यांची ओळख कायम स्मरणात राहणारी आहे.
स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर लहान भावासारखे प्रेम केले .तालुक्याच्या विकासात आमदार थोरात यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. त्यांचा आणि संगमनेर तालुक्याचा कायम जिव्हाळ्याचा संबंध राहिला असून त्यांच्या प्रति तालुका सदैव कृतज्ञ असल्याचे ही आ. डॉ तांबे यांनी म्हटले आहे



