अहमदनगर (प्रतिनिधी):-राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या दिनांक २६ मे शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच भाजपच्या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवारी रात्रीच ते नगर शहरात मुक्कामी येणार आहेत.
सकाळी अहमदनगर येथील नूतन शासकीय विश्रागृहाचे भूमिपूजन करून इतर विविध विकास कामांचा शुभारंभ देखील ते करणार आहेत. या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचा आढावा घेणार असून या आढावा बैठकी नंतर भाजप पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी मेळाव्यास ते संबोधित करणार आहेत. हा मेळावा पारिजात चौकातील कोहिनूर मंगल कार्यालय येथे होणार आहे. मेळाव्यात केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येवून नऊ वर्षे झाली त्यानिमित्ताने ३० मे ते ३०जुन या दरम्यान जन संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियान संदर्भात ते पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतील. या मेळाव्या नंतर शिर्डी येथील समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास ते उपस्थित राहणार आहेत.
या सर्व विविध विकास कार्यक्रमास तसेच पक्षाच्या मेळाव्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.



