श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा): – श्रीरामपूर शहर हद्दीतील सर्व नागरिकांना नगरपरिषदेकडून आज, दि. 1 जून 2024 पासून दर बुधवार व शनिवार पाणीपुरवठा खंडीत ठेवण्यात येणार आहे, तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासकीय अधिकारी श्रीरामपूर नगरपरिषद किरण सावंत पाटील व मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांना केले आहे.
श्रीरामपूर शहर हद्दीतील सर्व नागरिकांना पाटबंधारे विभागाकडून सध्या सोडण्यात आलेले शेतीच्या पाण्याचे हे मान्सून पूर्वीचे शेवटचे पाणी आवर्तन आहे. या आवर्तनातून नगरपरिषदेचे दोन्ही साठवण तलाव भरून घेण्यात आले आहेत. पाटबंधारे विभागाकडून यानंतर कोणतेही पाण्याचे आवर्तन मिळणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.
भंडारदरा निळवंडे धरणातील पाणीसाठा विचारात घेता चांगले पर्जन्यमान होऊन धरणात नवीन पाण्याची आवक झाल्याशिवाय पिण्याच्या पाण्याचे आवर्तन मिळणे शक्य नाही. त्यामुळे नगरपरिषदेकडे सध्या उपलब्ध असणारा पाण्याचा साठा काटकसरीने वापरणे अनिवार्य झालेले आहे. नगरपरिषदेकडून आजपासून दर बुधवार व शनिवार पाणीपुरवठा खंडीत ठेवण्यात येणार आहे.
नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासकीय अधिकारी श्रीरामपूर नगरपरिषद किरण सावंत पाटील व मुख्याधिकारी सोमनाथ जाधव व पाणीपुरवठा विभाग प्रमुख मनोजकुमार ईश्वरकट्टी यांना केले आहे.